Sanjay Raut : ‘आता वेळ निघून गेलीय’, जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Oct 18, 2024 | 11:24 AM

Sanjay Raut : "भाजपाशी कसं लढायचं ते आम्हाला माहित आहे. अमित शाह, भाजपा, मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास आम्हाला दिला. आम्ही तुरुंगात जाऊन आलो. टार्गेटवर कोण आहे? काय होऊ शकतं? हे आम्हाला माहिती आहे"

Sanjay Raut : आता वेळ निघून गेलीय, जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान
Follow us on

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी नियमित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मविआच जागा वाटप कुठे रखडतय ते सांगितलं. “आता सकाळी माझी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. आज राहुल गांधींशी बोलणार आहे. सीट शेयरिंग बद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे” असं संजय राऊत म्हणाले. “बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग, चर्चा होते. आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत मतभेद नाहीयत. काँग्रेस बरोबर सुद्धा तसे मतभेद नाहीयत. पण काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेस हायकमांडसोबत आम्ही चर्चा केली. बैठकीत जी चर्चा झाली, त्या बद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झालीय. पण काही जागांवर तिढा, पेच आहे. उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्यात, त्याचं पालन करीन” असं संजय राऊत म्हणाले.

‘भाजपच्या या बिष्णाई गँग आहेत’

“भाजपाचा पराभव आम्हाला करायचा आहे. या महाराष्ट्रात भ्रष्ट सरकार आहे. भाजपाशी कसं लढायचं ते आम्हाला माहित आहे. अमित शाह, भाजपा, मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास आम्हाला दिला. आम्ही तुरुंगात जाऊन आलो. टार्गेटवर कोण आहे? काय होऊ शकतं? हे आम्हाला माहिती आहे. भाजपच्या या बिष्णाई गँग आहेत. त्यांच्याकडे अशी हत्यारं नाहीत. पण ईडी, सीबीआयचा वापर करुन आम्हाला त्रास दिला. हे सर्व सहन करुन आम्ही उभे आहोत” असं संजय राऊत म्हणाले.