शिवसेना असाच जोरदार धक्का देते, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

| Updated on: Apr 03, 2024 | 8:49 PM

उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतानाच उद्धव ठाकरे यांनी मात्र एका नव्या उमेदवाराला संधी दिली आहे.

शिवसेना असाच जोरदार धक्का देते, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
uddhav on fadnavis
Follow us on

Uddhav Thackeray : सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरु असताना, उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपला धक्का दिला आहे. भाजपचेच उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं जळगावमध्ये भाजपला धक्का बसला. तर शिवसेना असाच जोरदार धक्का देते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देवून, उन्मेश पाटील ठाकरे गटात आले आहेत. उन्मेश पाटलांनाच जळगावमधून उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत धक्का दिला. उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटलांचेच खंदे समर्थक करण पवारांना उमेदवारी जाहीर केली. उन्मेश पाटलांसोबतच करण पवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

कोण आहेत करण पवार?

करण पवार पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. मराठा समाजाचा तरुण चेहरा अशी करण पवारांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटलांचे ते पुतणे आहेत.

आता जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांचा सामना ठाकरे गटाच्या करण पवारांशी होणार आहे. तर भाजपनं तिकीट कापल्यानंतर उन्मेश पाटलांनी पहिल्यांदाच भाष्यही केलंय. तिकीट कापल्यावरही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. मात्र झारीतले शुक्राचार्य असा उल्लेख करत काही नेत्यांनी डावलल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला आहे.

उन्मेश पाटील आणि करण पवारांच्या प्रवेशानंतर, उद्धव ठाकरेंनीही भाजपला टोला लगावला आहे. धक्के खाणारी शिवसेना नाही तर शिवसेना जोरात धक्का देते , असं ठाकरे म्हणाले आहेत. जळगावसह उद्धव ठाकरेंनी 4 मतदारसंघातल्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे.

ठाकरे गटाकडून ४ उमेदवार जाहीर

जळगावमधून करण पवार, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना तिकीट देण्यात आलंय.

कल्याण मधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याचा शक्यता आहे. इथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वैशाली दरेकरांना संधी दिली आहे.

2010 मध्ये वैशाली दरेकर मनसेकडून नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या. वैशाली दरेकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केलं आहे. 2009 मध्ये कल्याण लोकसभेत मनसेकडून लढताना 1 लाख 2 हजार मतं घेतली होती. मनसे सोडल्यानंतर पुन्हा ठाकरेंसोबत आल्या आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिल्या.

उद्धव ठाकरे यांच्याकडून आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर झाले आहेत. आता उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवार द्यायचा बाकी आहे. मात्र इथं मित्रपक्षानं लढावं असं आपण सांगितल्याचं ठाकरे म्हणाले आहेत. मात्र मित्र पक्षानं उमेदवार न दिल्यास, ठाकरे गटाचाच उमेदवार देणार हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.