‘…तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल’, वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन ठाकरे गटाने टोचले सत्ताधाऱ्यांचे कान

| Updated on: Jul 11, 2024 | 8:02 AM

मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत, असा आरोपही राऊतांनी केला.

...तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल, वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन ठाकरे गटाने टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
Follow us on

Sanjay Raut On Worli Hit And Run Case : मुंबईतील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाचे वडील राजेश शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचे उपनेते आहेत. त्यामुळे या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्‍यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. आता या दोन्ही प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली आहे.

“कारण सगळेच मिंधे झाले आहेत”

वरळीच्या ‘हिट अॅण्ड रन’ घटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी कलावंत जयवंत वाडकर यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. आरोपीस वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज होतेय असा आरोप वाडकर यांनीही केला आहे. मात्र अशा प्रसंगी मुंबईतील मराठी नटनटय़ा मंडळही गप्पच बसून राहते. मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

कुणाला बक्षिसे, कुणाला बिदाग्या दिल्या गेल्या असल्याने त्यांच्या ओझ्याखाली कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीच्या किंकाळय़ा विरून गेल्या. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा आहे. पोलिसांनी त्याच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी. तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल!, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा

“आता बहिणीच्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू”

कावेरी नाखवा यांचे पती सांगतात, ‘‘अपघात झाला तेव्हा मी आरोपीला गाडी थांबविण्याची विनवणी करीत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात आपटला तरीही त्याने गाडी थांबवली नाही व तो माझ्या पत्नीला तसाच फरफटत पुढे घेऊन गेला. गरीबांना या जगात कोणी वाली नाही.’’ कावेरीचे पती प्रदीप नाखवा यांचा हा आकांत आहे. मुख्यमंत्री राजकीय फायद्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल वाजवीत फिरत आहेत. पण त्यांच्याच आतल्या गोटातील गुन्हेगाराने कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीची हत्या केली. तिला चिरडून मारले व आता बहिणीच्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

“मुलगी व पतीचा आक्रोश बधिर सरकारपर्यंत पोहोचेल का?”

राजेश शहा नावाच्या ‘महात्म्या’ला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातून काढून टाकले आहे. गुन्हा एवढा ढळढळीत असताना या महाशयांना पक्षातून काढण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी 60 तास घेतले. महाराष्ट्राचे सरकार हे केवळ श्रीमंत व गुन्हेगारांसाठीच काम करत आहे. तसे नसते तर कावेरी नाखवा यांचा खून करणाऱ्या मिहीर शहाच्या बापाला जामीन मिळालाच नसता. या राजेश शहाने आपल्या खुनी पोराला पळून जाण्यासाठी मदत केली व पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही खुन्याचा बाप जामिनावर सुटतो हा चमत्कार मिंधे सरकारमध्येच घडू शकतो. मृत कावेरी नाखवा यांची मुलगी व पतीचा आक्रोश बधिर सरकारपर्यंत पोहोचेल काय? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.