मुंबईतील ठाकरे गटाचे दोन आमदार अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर हे सध्या वेटिंगवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजय चौधरी हे शिवडी आणि प्रकाश फातर्पेकर हे चेंबूर येथून आमदार आहेत. गुरुवारी संध्याकाळी मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. सध्या उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. या महत्त्वाच्या बैठकीसाठी अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती आहे. त्यामुळे या दोन आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवडी आणि चेंबूर या दोन्ही मतदारसंघात अन्य प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळेच अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर या दोघांचा मार्ग सोपा नाहीय. या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करताना उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर मागच्या दोन टर्मपासून आमदार आहेत. 10 वर्षापासून ते विधानसभेवर शिवडी आणि चेंबूरच मतदारसंघाच प्रतिनिधीत्व करतायत. चेंबूरमधून माजी नगरसेवक अनिल पाटणकर उमेदवारीसाठी आग्रही आहेत. शिवडीमधून लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठाकरे गटाने लोकसभा समन्वयक म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती केली होती. शिवडी हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फक्त 2009 चा अपवाद वगळता शिवडीतून सातत्याने शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2009 मध्ये मनसेच्या बाळा नादंगावकर यांनी कार्यसम्राट आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता. पण 2014 मध्ये अजय चौधरी यांनी या पराभवाची परतफेड केली. नांदगावकरांना हरवून शिवडी विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवला. तेव्हापासून तेच आमदार आहेत.
म्हणून सुधीर साळवी यांच्या नावाचा विचार
आता 2024 विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाळा नांदगावकर यांनी प्रचार सुरु केला आहे. शिवडीमध्ये आजही ठाकरे गटाची ताकद आहे. शिवसेना फुटल्याचा शिवडीवर कोणताही परिणाम झाला नाही. पदाधिकारी, कार्यकर्ते आजही ठाकरेंसोबत आहे. शिवडीत ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. त्यामुळे इथे उमेदवार बदलला जाऊ शकतो. अजय चौधरी यांची उमेदवारी धोक्यात येण्याच आणखी एक कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून घटलेलं मताधिक्क्य. त्यामुळेच अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी दिली, तर निवडून येण्याबद्दल पक्षाला साशंकता वाटतेय. त्यामुळेच सुधीर साळवी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.