Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? या महिला आमदाराचं नाव चर्चेत

| Updated on: Dec 09, 2022 | 4:43 PM

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत.

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? या महिला आमदाराचं नाव चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी आपली पंरपरा कायम ठेवली आहे. कोणत्याही पक्ष दुसऱ्या वेळी लागोपाठ सत्तेत येत नाही. त्यामुळे भाजपची सत्ता जावून आता राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसने (Congress) बहुमत मिळवल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून मंथन सुरू झाले आहे. याबाबत शिमल्याच्या हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आतापासून शक्तीप्रदर्शन सुरु झाले आहे.

हॉटेलबाहेर प्रतिभा सिंह (Pratibha Singh) यांचे समर्थक शक्तिप्रदर्शनासाठी हॉटेलबाहेर जमले होते. प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. समर्थकांनी प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्रीपदावर दावा

प्रतिभा सिंह म्हणाल्या होत्या की, ‘आमदार त्यांचा नेता निवडतील आणि त्यांचे मत पक्ष हायकमांडला कळवतील. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत (CM Post) आहे असे म्हणत नाही, पण ही निवडणूक वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) यांच्या नावाने जिंकली आहे. त्याच्या कुटुंबाचा वारसा आपण दुर्लक्षित करू शकत नाही.’ शिमल्यात काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक भूपेंद्र हुडा आणि भूपेश बघेल हे शिमल्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 68 पैकी 40 जागांवर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिमला काँग्रेस कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

अशी झाली राजकारणात एन्ट्री

वीरभद्र सिंह हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (Ex CM of Himachal Pradesh) राहिले आहेत. त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह 1998 मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचे महेश्वर सिंह (Maheshwar singh) यांनी त्यांचा सुमारे 1.25 लाख मतांनी पराभव केला. महेश्वर सिंग हे त्यांचे मेहुणे आहेत.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) प्रतिभा यांनी दुसऱ्यांदा नशीब आजमावले. महेश्वर यांचा पराभव करत ते संसदेत पोहोचल्या. 2012 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वीरभद्र सिंह यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. यानंतर 2013 मध्ये प्रतिभा सिंह यांनी पोटनिवडणूक झाली. प्रतिभा या राजकारणात सक्रीय झाल्या. या निवडणुकीत त्यांनी जयराम ठाकूर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

2014 साली मोदी लाटेत प्रतिभा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपच्या रामस्वरूप शर्मा यांनी 39 हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला. वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर 26 एप्रिल 2022 रोजी काँग्रेस हायकमांडने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सहा महिन्यांच्या या जबाबदारीत प्रतिभा यांनी आपली राजकीय प्रतिभा सिद्ध केली. आता त्यांनी वीरभद्र कुटुंबीयांनी केलेलं नेतृत्व याबद्दल वक्तव्य केलंय.