भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संघात स्थान मिळालं नव्हतं. पण दुसऱ्या सामन्यात शुबमन गिलच्या जागी संघात स्थान मिळालं. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. संजू सॅमसनकडून त्याच्या चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण यावेळी त्याला फलंदाजीसाठी ओपनिंगला पाठवलं होतं. आक्रमक होत फटकेबाजी करेल असा विश्वास होता. पण त्याच्या चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला. संजू सॅमसन त्याच्या स्वभावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात संधी गमवण्याची वेळ आणून बसला आहे. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावा दिल्या. पण भारताचा डाव सुरु झाला आणि पावसाने हजेरी लावली.
डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला सुधारित आव्हान देण्यात आलं आहे.
विजयासाठी 8 षटकात 78 धावा करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन मैदानात उतरले. दुसऱ्या षटकात संजू सॅमसनला स्ट्राईक मिळाली. पण पहिल्याच चेंडूवर महीश थीक्षाणाने त्याचा त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यात संधी मिळणं कठीण होणार आहे. कारण शुबमन गिल फिट अँड फाईन होईल. तर रियान परागची जागा मिळणं कठीण आहे. अशात तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की बेंचवर बसेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
दरम्यान भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. यशस्वी जयस्वालने 15 चेंडूत 30 धावा केला. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. सूर्यकुमार यादवने 12 चेंडूत 26 धावा केल्या. हार्दिक पांड्या नाबाद 22 आणि ऋषभ पंत नाबाद 2 धावांवर राहिले. भारताचा तिसरा सामना 30 जुलैला होणार आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.