भारतीय संघासाठी यंदाचा टी20 विश्वचषक अतिशय खराब सुरु आहे. पहिले दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यामुळे भारताच्या पुढील फेरीच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. दरम्यान आगामी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकणे भारताला अनिवार्य आहे. अशावेळी पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध असल्याने भारतासाठी त्यांचा स्टार फिरकीपटू राशिद खान एक मोठा धोका आहे. कारण भारतीय फलंदाजी राशिदसमोर अनेकदा गुडघे टेकताना दिसली आहे.
भारताची फलंदाजी म्हटलं तर पहिलं नाव येतं कर्णधार विराट कोहली. कोहलीने राशिदविरुद्ध 24 चेंंडू खेळले असून केवळ 21 धावा केल्या आहेत. तसंच एक वेळा तो राशिदच्या चेंडूवर बादही झाला आहे.
विराटनंतर सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माचा विचार करता त्याने राशिद खानचे 16 चेंडू खेळत त्यात 19 धावाच केल्या आहेत. तर दोन वेळा राशिदने त्याला बाद केलं आहे.
दुसरा सलामीवीर केएल राहुलचा विचार करता त्याने राशिदविरुद्ध 30 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. पण तो तीन वेळा बादही झाला आहे.
इशान किशनला जर अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली तर त्याच्यावरही फलंदाजीची मदार असेल, इशान विरुद्ध राशिद असा विचार करता इशानने 51 चेंडूत राशिदविरुद्ध 64 धावा केल्या आहेत. पण तोही एकदा बाद झालाच आहे.
हार्दिक पंड्याचा विचार करता त्याने राशिदला 37 चेंडूत केवळ 27 धावा ठोकल्या असून तो दोन वेळी बादही झाला आहे.