टी-20चा विश्व चषक जिंकून जगज्जेते ठरलेल्या टीम इंडियाचं दिल्ली आणि मुंबईत दणक्यात स्वागत झालं. टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईच्या रस्त्यावरून व्हिक्ट्री परेड निघाली. आपल्या क्रिकेट हिरोंचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर जनसागर उसळला होता. ढोलताशे वाजवत आणि जय होच्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींना खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी अनेकांनी रस्त्यावरच ठेका धरला. त्यासोबत खेळाडूंनीही ठेका धरला. या खेळाडूंवर बीसीसीआयने बक्षिसांची लयलूट केली आहे. यात महाराष्ट्र सरकारही मागे राहिलेलं नाही. राज्य सरकारनेही टीम इंडियाच्या चार खेळाडूंसाठी कोट्यवधींचं बक्षीस जाहीर केलं आहे.
राज्य सरकारने टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी या चारही खेळाडूंना प्रत्येकी एक कोटीचं बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. तर बीसीसीआयने टीम इंडियाच्या सर्व खेळांडूसाठी एकूण 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
काल वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या क्षणामुळे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू भावूक झाले होते. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माने तर हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं म्हटलं. हा प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. टीम इंडियाच्या विजयात जसप्रीत बुमराहची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्याने फायनल मॅचमध्ये अखेरच्या पाच ओव्हरमध्ये दोन ओव्हर टाकल्या. त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या, असं रोहित शर्मा म्हणाला.
तर ही ट्रॉफी संपूर्ण देशासाठी आहे. भारतासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची आहे, असं विराट म्हणाला. यावेळी विराटने वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या हार्दिक पांड्याचं तोंडभरून कौतुक केलं. गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही मेहनत केली होती. त्याचं फळ मिळालं. जिंकल्याचा अभिमान वाटतो. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे, असंही विराटने सांगितलं.
यावेळी टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडनेही प्रतिक्रिया व्यक्त केली. ही टीम नाही तर माझं कुटुंब आहे. आज आनंदाच्या या क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळत आहे. हा कायम स्मरणात राहील असाच क्षण आहे, असं राहुल म्हणाला.