टीम इंडियाला आगामी दौऱ्यामध्ये कॅप्टन रोहित शर्माशिवाय मैदानावर उतरावं लागू शकतं. कदाचित हे चित्र ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावर दिसेल. टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी दोन्ही टीम्समध्ये 5 टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. रोहित खासगी कारणांमुळे या दौऱ्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकू शकतो, असा एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. असं झाल्यास एका खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. मागच्या काही दिवसांपासून या खेळाडूची चर्चा आहे. बऱ्याच काळापासून त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी होत आहे. हा खेळाडू आहे बंगाल क्रिकेट टीमचा फलंदाज अभिमन्यु ईश्वरन.
रोहित शर्मा एका टेस्ट मॅचसाठी बाहेर होणार असेल, तर ओपनिंगला त्याच्याजागी कोण येणार? हा टीम इंडियासमोर प्रश्न असेल. मागच्या एक वर्षापासून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी टेस्टमध्ये ओपनिंगला येत आहेत. सलामीला या जोडीने चांगली कामगिरी केली आहे. रोहितची जागा घेणं सोपं नाहीय. अशा स्थितीत निवड समिती एक्सट्रा ओपनरला स्क्वॉडमध्ये जागा देणार का? पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार, अशा स्थितीत अभिमन्यु ईश्वरन बॅकअप ओपनर म्हणून टीममध्ये स्थान मिळू शकतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीआधी इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए मध्ये सीरीज होणार आहे. योगायोगाने ईश्वरन त्यावेळी ऑस्ट्रेलियातच असेल. ईश्वरनला इंडिया ए च कर्णधार बनवलं जाऊ शकतं.
निवड होऊनही डेब्युची संधी मिळणं कठीण का?
अभिमन्यु ईश्वरनची याआधी दोनवेळा टीम इंडियात निवड झाली आहे. पण 29 वर्षाच्या या फलंदाजाला डेब्युची संधी मिळालेली नाही. यावेळी सुद्धा असं होणार का? यावर सगळ्यांची नजर असेल. ईश्वरन टीम इंडियात समावेश झाला, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण टीम इंडियाकडे शुभमन गिल आणि केएल राहुलचा पर्याय आहे. दोघांकडे फक्त कसोटी क्रिकेटचाच अनुभव नाहीय, तर दोघांनी ऑस्ट्रेलियातही ओपनिंगची जबाबदारी संभाळली आहे. त्यामुळे अभिमन्यु ईश्वरनला डेब्युची संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
रणजीमध्ये किती धावा केल्यात?
अभिमन्यु ईश्वरनने 98 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 49 च्या सरासरीने 7506 धावा केल्या आहेत. यात 26 सेंच्युरी आणि 29 हाफ सेंच्युरी आहेत. रणजी ट्रॉफी आणि इंडिया ए कडून खेळताना तो मोठ्या इनिंग खेळला आहे. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ईश्वरन मागच्याच आठवड्यात इराणी कपमध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात 191 धावांची शानदार इनिंग खेळला. त्याआधी दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी कडून 157 नाबाद आणि 116 धावांची इनिंग खेळला. शुक्रवार 11 ऑक्टोंबरपासून रणजी ट्रॉफीचा सीजन सुरु होतोय. हाच फॉर्म कायम ठेवत इंडिया ए कडून ऑस्ट्रेलियात तो अशीच इनिंग खेळला तर टीम इंडियात त्याची निवड पक्की आहे.