KKR vs RCB : RCB च्या विजयाने मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या का खुश झाला? कारण खास आहे

| Updated on: Mar 23, 2025 | 8:21 AM

KKR vs RCB : IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाइट रायडर्सला 7 विकेटने हरवलं. या मॅचनंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या खूप खुश दिसला. त्याने सोशल मीडियावर पोस्टकरुन आरसीबीच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

KKR vs RCB : RCB च्या विजयाने मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या का खुश झाला? कारण खास आहे
RCB-Hardik Pandya
Image Credit source: PTI
Follow us on

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सीजनचा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये झाला. ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात आरसीबीने शानदार प्रदर्शन करत कोलकाता नाइट रायडर्सला हरवत टुर्नामेंटची विजयी सुरुवात केली. आरसीबीने आधी गोलंदाजीत कमाल दाखवली आणि मग फलंदाजीत. सामना एकतर्फी झाला. आरसीबीच्या या विजयावर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने आनंद व्यक्त केला. ते कारण चर्चेचा विषय बनलं आहे.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या प्रदर्शनावर खूप आनंदी दिसला. यामागच सर्वात मोठ कारण आहे, त्याचा भाऊ क्रुणाल पंड्या. क्रुणाल पंड्या यावेळी आरसीबी टीमकडून खेळतोय. सीजनच्या पहिल्या सामन्यात तो मॅच विनर ठरला. हार्दिक आणि क्रुणाल पंड्याच नातं क्रिकेट विश्वात कोणापासून लपून राहिलेलं नाही. दोन्ही भावांनी अनेकदा एकत्र मैदानात कमाल दाखवली आहे. खासकरुन दोघे जेव्हा मुंबई इंडियन्सकडून खेळायचे. पण मागच्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये दोघे भाऊ वेगवेगळ्या टीमकडून खेळत आहेत.

हार्दिक आज का खेळणार नाही?

हार्दिक क्रुणाल पंड्याच्या प्रदर्शनावर खूप आनंदी दिसला. त्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. हार्दिक पंड्याने या मॅचनंतर त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर क्रुणाल पंड्याचा एक फोटो शेअर केला. सोबतच त्याने नजर न लागणारा इमोजी सुद्धा शेअर केला. हार्दिकने सामन्यादरम्यान क्रुणाल पंड्यासाठी एक स्टोरी शेअर केली. मुंबई इंडियन्स या सीजनमधला पहिला सामना 23 मार्चला म्हणजे आज खेळणार आहे. पण हार्दिक या मॅचमध्ये खेळणार नाही. मागच्या सीजनमध्ये मुंबईच्या शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्याच्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

RCB कडून त्याचा दमदार डेब्यु

क्रुणाल पंड्याने आरसीबीसाठी आपल्या डेब्यू मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 29 धावा देत 3 विकेट काढल्या. क्रुणाल पंड्याने अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंह सारख्या मोठ्या फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे आरसीबीला केकेआरला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आलं. या प्रदर्शनासाठी क्रुणाल पंड्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.