‘मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात…’, रतन टाटांचा ‘हा’ किस्सा होतोय व्हायरल

| Updated on: Oct 10, 2024 | 9:06 PM

. रतन टाटा यांच्या दानशूरपणाचे, देशभक्तीचे अनेक किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. “मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन", अशा शिर्षकाखाली हा किस्सा व्हायरल होतोय.

मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात..., रतन टाटांचा हा किस्सा होतोय व्हायरल
रतन टाटा
Follow us on

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या दानशूरपणाचे, देशभक्तीचे अनेक किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. “मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन”, अशा शिर्षकाखाली हा किस्सा व्हायरल होतोय. जेव्हा रतन टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले की, “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का?” त्यावर रतन टाटा यांनी खूप सुंदर उत्तर दिले होते. याचबाबतचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

“रतनजी टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.”

“चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली. पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी. मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला.”

“मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले, “तुला आणखी काही हवे आहे का?” मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.”

“मुलाने म्हटले, “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन. वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का? कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.”