छत्रपती संभाजीनगर, ३ नोव्हेंबर २०२३ | सलग ९ दिवसांपासून विना अन्न-पाण्याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत जात होती. यावेळी त्यांना समस्त मराठा समाजाकडून पाणी पिण्याची विनंती केली जात होती. मात्र त्यांनी ती विनंती नाकारली होती. इतकेच नाहीतर त्यांनी डॉक्टरांचं पथक देखील परत पाठवलं होतं. मात्र काल उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जास्त खालावल्याचे समोर आले आहे. जरांगे पाटील यांचा अशक्तपणा वाढला असून त्यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर उलट्याही सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. गुरूवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले उपोषण सोडले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. जरांगे पाटी यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आल्याने त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे सांगितले जात आहे.