Chaityabhoomi News : चैत्यभूमीवर काय झालं? कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : रायगडाच्या कार्यक्रमानंतर आता चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून विसंवाद झालेला बघायला मिळाला आहे. कार्यक्रमपत्रिकेत नाव असूनही शिंदे आणि अजितदादांना भाषण करण्याची संधीच मिळालेली नाही.
रायगडाच्या कार्यक्रमानंतर आता चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून विसंवाद झालेला बघायला मिळाला आहे. कार्यक्रमपत्रिकेत नाव असूनही शिंदे आणि अजितदादांना भाषण करण्याची संधीच मिळालेली नाही. चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचीच भाषणं झाली आहेत. त्यानंतर चैत्यभूमीवर भाषण झालेल नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमपत्रिकेत देखील भाषणासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं होती. मात्र अभिवादन कार्यक्रमानंतर थेट राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यानंतर शिंदे आणि दादांना भाषणाची संधी देण्यात आलीच नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंचं नाव कट झाल्यामुळे त्यांनी याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली, तेव्हा तुम्हाला भाषण नसल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली नव्हती का? असा प्रश्न केला. शिंदे आणि अजितदादांचं नाव असलेली कार्यक्रमपत्रिका काल तरीच बदलण्यात आलेली होती. कार्यक्रमानंतर अजितदादा थेट निघून गेले. तर कोणत्या अधिकाऱ्याने कार्यक्रमपत्रिका बदलली याबद्दल शिंदे चौकशी करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.