आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ४१ निर्णयांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या ४१ निर्णयांमध्ये राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेसाठी लाभार्थी होण्याची इच्छा आहे अशा लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोळी बांधवांसाठी राज्य सरकारकडून लवकरच आणखी एका महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. नुकतीच या महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मच्छिमार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोळी बांधवांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर कोळी बांधवाकडून एकच आनंद व्यक्त करण्यात आला आहे.