पालघर जिल्ह्यात गेल्या आठवाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पालघरमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. पाऊस चांगलाच होत असल्याने राज्यातील पर्यटन स्थळ पर्यटकांनी चांगलीच बहरली आहे. अशातच पालघर मधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हारमध्ये दाभोसा धबधबा, जय विलास पॅलेस, शिरपामाळ, हनुमान पॉइंटसह इतर ठिकाणांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जवळच्या केंद्र शासित प्रदेशसह राज्यातील पर्यटक जव्हार भागात आनंद लुटण्यासाठी येत आहेत. दरवर्षी मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली की, पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये असणारा हा दाभोसा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे.