पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये ‘लखपती दिदी’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित महिला वर्गाला संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आनंदाची गोष्ट आहे. मोदी म्हणतात, विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेत आल्या तरच देशाचा उद्धार होईल. म्हणून बेटी बचाव पासून ते लखपती दीदी पर्यंत त्यांनी मोठ्या योजना आणल्या आहेत. २०२९ नंतर देशाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, राज्यात आम्ही लाडकी बहीण योजना, अर्ध्या पैशात एसटीचं तिकीट दिलं आणि मोफत गॅस सिलिंडर दिलं आहे. मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्र मागे पडणार नाही. राज्यात ७५ लाख परिवार बचत गटाशी जोडलेले आहेत. ते लवकरच २ कोटीपर्यंत करणार आहोत. महिलांना दिलेला पैसा त्या परत करतात. त्या एकपैसाही बुडवत नाहीत. त्यामुळे महिलांसाठी काम करायला बँका आणि सोसायट्या तयार असल्याचे म्हणत महिलावर्गाबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.