बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर सरकारचे डोळे उघडले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासगी शाळांना दिले आहेत. यासोबतच सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर पीडित चिमुकलीच्या शाळेत सीसीटीव्ही नसल्याचे निदर्शनात आलं आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी हे निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. खासगी शाळांनाही हे अनिवार्य आहे, पण या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असेल तर जबाबदारी शाळेची असणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तर बदलापूर येथे घडलेले प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये, असे म्हणत दीपक केसरकर यांनी असेही सांगितले की, विशाखा समिती आता शाळेतही अनिवार्य असेल, मोठ्या विद्यार्थिनींसाठी विशाखा समिती असेल. याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.