नवी मुंबई, पनवेल, कळंबोली आणि तळोजा या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे पडघे तळोजा या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसतंय. पनवेलमधील नावडे नदीला पूर आला आहे. तर कळंबोली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळावर पाणी साचलं आहे. कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रूळावर आल्याने कोकण रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईच्या दिशेने येत असताना अडकली आहे. बराच वेळ एक्सप्रेस एकाच जागीच उभी राहिल्याने प्रवाशी गाडीतून उतरून रेल्वे रूळावरून वाट काढत नजीकच्या स्टेशनवर पोहोचत आहेत.