राज्यातील अनेक भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पण मुबईकरांना मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत पावसाने हजेरी लावण्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याचे दिसतेय. मागील आठवड्यात काही तासांसाठी मुंबईकरांना पावसाची रिमझिम अनुभवायला मिळाली होती. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने अद्यापही उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. अशातच आता पुन्हा भारतीय हवामान विभागाकडून मुंबईत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर पुन्हा एकदा मनसोक्त पावसात भिजण्याची प्रतिक्षा करत आहेत. हवामान खात्याकडून मुंबई, पुणे, ठाणे, पालघर या भागांना यल्लो अलर्ट देण्यात आलाय तर २१ जूनपासून मुंबईत पाऊस सुरू होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे सगळ्यांनाच आत्ता काही दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे.