गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस पडतोय… काही जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताना दिसताय. मात्र लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गावातील नदी-ओढ्यांना मोठा पूर आला आहे. रेणापूर तालुक्यातल्या सिंधगाव-आंदलगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्याला पूर आल्याने गावकऱ्यांना या पुराच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करावी लागतेय. हा जीवघेणा प्रवास करत गावकऱ्यांना आपले गाव गाठावे लागत आहे. तर रेणापूर तालुक्यातल्याच कामखेड ते काळेवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याला देखील पूर आल्याने गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.अनेक नदी-ओढ्यावर कमी उंचीचे पूल असलेल्या ठिकाणी अशी परिस्थिती उदभवली असल्याची माहिती मिळतेय.