मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होतोय. अशातच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काय-काय कारवाई झाली याची माहिती दिली. राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी शांततेत आंदोलनं झाली तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. या हिंसक आंदोलनामुळे संभाजी नगरमध्ये ५४ गुन्हे आणि १०६ आरोपी अटकेत आहेत तर बीडमध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत. बीडमध्ये २० गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ३०७ आयपीसीनुसार ७ गुन्हे दाखल झालेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १४१ गुन्हे दाखल असून १६८ अटक आरोपी आहेत तर १४६ आरोपींना ४१ अ नुसार नोटीस पाठवण्यात आलीये. या आंदोलनामुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान झालंय. तर बीडमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये. तसेच बीड, संभाजी नगर ग्रामीण आणि जालन्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.