“भाजपकडे सध्या काही काम नाही. भाजप पक्ष हा एक भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिलाविरोधी अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या ८ दिवसात २७ ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग भाजपचे कार्यकर्ते बनावट प्रकरणं निर्माण करतात. खरं तर ते भाजपचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत. त्यांचं आयटी सेल, झेंडे फडकवणारी लोकं हे सर्व पगारी नोकर आहेत”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. पुढे राऊत असेही म्हणाले, भाजपचे हे लोक महाविकासआघाडीबद्दल ज्या भूमिका घेत आहेत, त्या बनावट आणि खोटारड्या भूमिका आहेत. त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर थेट अशाप्रकारचे आरोप आहे. फक्त आरोप नाही, तर त्या महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आधी जा आणि फडणवीसांना सांगा की त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा. त्यानंतर मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.