Sanjay Raut : हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Nagpur Violence : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना नागपूरमध्ये झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया देत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.
कारवाया फक्त भीमा कोरेगाव, एल्गार, माओवादी यांच्यावर करून चालत नाही. महाराष्ट्र वेठीस धरणाऱ्या प्रत्येकावर व्हायला हवी. त्यामुळे कालची जाळपोळ ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघायला हवी आणि मग आरोपी हे कोणत्या धर्माचे, पक्षाचे किंवा गटाचे आहेत हे न बघता कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या नागपूरमधल्या राड्यावर बोलताना दिली आहे. यावेळी राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केलेली बघायला मिळाली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे हल्ले करणारे कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे? राज्यात अशा घटना का घडत आहे? आणि का घडवल्या जात आहे, हा राज्यातील संशोधनाचा विषय झाला आहे. होळीला देखील यांनी वातावरण खराब केलं होतं. गुढीपाडव्याला देखील हेच लोक वातावरण बिघडवतील असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व घटनांमागे ओळखीचेच चहरे आहेत. नागपूरमधील घटने मागे देखील कोणताही बाहेरचा चेहेरा नाही, तर ओळखीचेच चेहरे असल्याचा गंभीर आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.