मुंबई येथील धारावीच्या मस्जिद प्रकरणावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. हे प्रकरण ताजं असतानाच काल अमरावतीच्या अचलपूरमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या अचलपूर शहरात हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. नितेश राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. अमरावतीच्या अचलपूर ठाण्यात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी उदय सामंत यांना सवाल केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे की नाही मला माहिती नाही . पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. आम्हाला आजही या संतांच्या मेळाव्यात देखील हेच ऐकायला मिळालं, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अचलपूरमध्ये जिहादी लोकांनी आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आधी त्यांच्या तंगड्या तोडा व नंतर पोलिसांत तक्रार करा. तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.