मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपमध्ये अशोक चव्हाण यांची भूमिका काय असणार? यासंदर्भात सध्या एकच चर्चा सुरू आहे. अशातच पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनीधींनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेसवरच हल्लाबोल केलाय. फडणवीस म्हणाले, चव्हाण हे दोनदा मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांचा रोल काय असेल हे केंद्रीय भाजपशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. चव्हाण हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे केंद्रीय भाजपशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. पुढे ते असेही म्हणाले की, काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही. नेते सांभाळता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षात मोट बांधता येत नाही. कारण कुणाचा कशात पायपोस नाही. एवढे मोठे नेते एवढ्या वर्षाची पुण्याई सोडून भाजपमध्ये का येत आहे. हे त्यांना कळत नाही. त्यांना काय करतोय हे माहीत नाही. भाजपला विरोध करता करता ते विकासाला विरोध करत आहे. त्यांना घर का सांभाळता येत नाही त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्यांनी पक्ष मोठा केला. पक्ष वाढवला ते का पक्ष सोडत आहेत. याचं काँग्रेसने आत्मचिंत केलं पाहिजे, असेही म्हणत काँग्रेसला फडणवीसांनी सल्ला दिला.