केळीच्या पट्ट्यात हळदीची मक्तेदारी; जळगावमधील शेतकर्यांनी पॅटर्न बदलला, रान होणार सोन्याहून पिवळं
Turmeric Farming in Banana Belt : पारंपरिक पिकांचे आर्थिक गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल बदलू लागला आहे. वेगवेगळ्या पिकांचा कल वाढला आहे. जळगाव म्हटले की केळी आपल्या डोळ्यासमोर येते. पण तिथे आता हळद सोनसळी ठरू पाहत आहे.

पारंपरिक पिकांचे आर्थिक गणित जुळत नसल्याने शेतकर्यांचा कल बदलू लागला आहे. वेगवेगळ्या पिकांचा कल वाढला असून हल्ली हळद लागवडीकडे झुकताना दिसत आहे. जळगाव म्हटले की केळी ही आपसूकच आपल्यासमोर येते. येथील केळीला देश-विदेशात मोठी मागणी आहे. केळीवर आधारीत अनेक पूरक उद्योग येथे उभे राहिले आहे. त्यात पत्रवाळीपासून ते केळीच्या विविध टाकाऊपासून टीकाऊ वस्तू हे एक प्रमुख उत्पादन आहे. केळीच्या चिप्सचे प्रमाण अशात मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. पण मुक्ताईनगर भागात केळीसोबतच हळदीचा वरचष्मा दिसून येत आहे. शेतकर्यांनी पिक घेण्याचा पॅटर्न बदलला आहे. हळदीची लागवड वाढली आहे. त्यामुळे सध्या हळदीच्या बेण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेण्यांच्या दरात किमान सातशे ते कमाल पंधराशे रुपयांची दर वाढ झाली आहे.
कापूस, मका, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांचे उत्पन्न आणि त्यातून मिळणारा मोबदला पाहता पिकांवर केलेला खर्च ही निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी फळ आणि मसाले पिकांवर नशीब आजमाविण्याच्या प्रयत्नात आहे. यातूनच आले पाठोपाठ आता हळद पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढताना दिसत आहे. लहरी निसर्ग, शेतीचा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पादन यातून शेतीचे गणित जुळवण्यासाठी काही शेतकरी जबरी धाडस करू पाहत आहेत. वेगळा प्रयोग करून शेती अधिक फायदेशीर कशी करता येईल याकडे त्यांचा ओढा आहे.
एकरी १० क्विंटल बेण्याची लागवड




हळदीचे पीक लागवड करण्यासाठी बेणे निवडण्याची दक्षता महत्त्वाची असते. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गडे वापरण्यास पसंती असते, प्रत्येक गड्ड्यावर ८ ते १० कोंब असतात. लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे हे डोळे फुटलेले ४० ते ५० ग्रॅम वजनाचे आणि मुळ्याविरहित असल्यास त्याला मागणी अधिक असते. एकरी १० क्विंटलपर्यंत बेणे लागते. नऊ महिन्यांचे हे पीक आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः मे महिन्यात हळद लागवड केली जाते, त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच शेतकरी हळद बेण्याच्या शोधात असतात.
सेलम बेण्याला अधिक मागणी
चांगल्या प्रतिच्या बेण्याला शेतकर्यांची पसंती असते. अशा बेण्याचे भावही जास्त आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत किमान सातशे ते कमाल पंधराशे रुपयांची दरवाढ झाली आहे. सेलम बेण्याला मागणी अधिक आहे. त्यामुळे हिंगोली पाठोपाठ आता राज्यात इतर ठिकाणी सुद्धा हळदीची लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येते. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शेतकर्यांना त्यांची जमाखर्चाची मांडणी करत मिळकत वाढवता येईल.