कुख्यात गुंडांना अटक अन् धिंडही काढली, पोलीसांची कारवाई, कुठे घडला हा प्रकार ?

| Updated on: Oct 10, 2023 | 11:39 AM

अनेक महिन्यांपासून दहशत माजवणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेतले. लोकांच्या मनात असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्या गुंडाची चक्क धिंड काढली.

कुख्यात गुंडांना अटक अन् धिंडही काढली, पोलीसांची कारवाई, कुठे घडला हा प्रकार ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मनोहर शेवाळे, Tv9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव | 10 ऑक्टोबर 2023 : शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्ह्यांचे (crime cases in city) प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिस कठोर उपाययोजना करत असून त्यांना काही वचक बसत नव्हता. गुन्हेगारांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याचदरम्यान मालेगाव पोलिसांनी (malegoan police) केलेल्या एका मोठ्या कारवाईकडे लक्ष वेधले गेले असून त्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

मालेगाव शहरात अनेक महिन्यांपासून दहशत माजवणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेख रब्बानी उर्फ रब्बानी दादा असे आरोपीचे नाव असून मालेगाव पवारवाडी पोलिसांनी (robbers arrested)  ही कारवाई केली. त्याच्यासह आणखी दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच धाड

शेख रब्बानी उर्फ रब्बानी दादा हा एक कुख्यात गुन्हेगार असून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. शहर व परिसरात बऱ्याच काळापासून त्याचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. शेख रब्बानी आणि त्याचे साथीदार हे विविध ठिकाणी दरोडा टाकून, लुटालूट करून फरार व्हायचे. त्यामुळे नागरीक अतिशय त्रासले होते. पोलीसही बऱ्याच महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते.

शेख रब्बानी आणि त्याचे इतर साथीदार हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाचा पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक करत त्यांचा प्लान उधळून लावला. मालेगाव पवारवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देसी पिस्तुल, सहा जिवंत काडतूस आणि एक तलवार असा मुद्देमालही जप्त केला. मालेगाव येथील अप्पर सत्र न्यायालय यांनी 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

दहशत कमी व्हावी म्हणून काढली धिंड

या गुंडाची शहरात खूपच दहशत होती, लोकं त्यांना खूपच घाबरायचे. हेच लक्षात घेऊन आणि लोकांच्या मनातील त्यांची दहशत कायमची नष्ट व्हावी यासाठी पोलिसांनी या सर्व आरोपींची त्या परिसरात धिंड काढली. त्यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.