अमीषा पटेलचा ‘Gadar 2’च्या दिग्दर्शकांसोबतचा वाद मिटला? चित्रपट हिट करण्यासाठी केला होता ड्रामा?

| Updated on: Jul 21, 2023 | 12:34 PM

काही दिवसांपूर्वी अमीषाने ट्विटरवर 'गदर 2'च्या प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवरील व्यवस्थापन योग्य नसल्याचा खुलासा तिने केला होता. अमीषाचे हे सर्व आरोप अनिल शर्मा यांनी फेटाळले होते.

अमीषा पटेलचा Gadar 2च्या दिग्दर्शकांसोबतचा वाद मिटला? चित्रपट हिट करण्यासाठी केला होता ड्रामा?
Ameesha Patel with Gadar 2 director
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेत्री अमीषा पटेल बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. आगामी ‘गदर 2’ या चित्रपटात ती पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अमीषाने दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर बरेच आरोप केले होते. या आरोपांनंतर आता तिने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक आनंदी फोटो पोस्ट केला आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्यांचा आदर करत असल्याचं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. त्यामुळे तिने आधी केलेले आरोप म्हणजे पब्लिसिटीसाठी किंवा चित्रपट हिट करण्यासाठी केलेला ड्रामा होता का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अमीषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या बाजूला बसलेली पहायला मिळत आहे. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. ‘अनिल शर्मा यांच्या ऑफिसमध्ये आज त्यांच्यासोबत पूर्ण दिवस घालवला. हे तेच दिग्दर्शक आहेत ज्यांना मी गेल्या 24 वर्षांपासून ओळखतेय आणि त्यांचा आदर करतेय. चित्रपटाची संपूर्ण टीम अनिलजी यांच्यासोबत मिळून खैरियत हे गाणं पाहताना खूप मजा आली’, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी अमीषाने ट्विटरवर ‘गदर 2’च्या प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवरील व्यवस्थापन योग्य नसल्याचा खुलासा तिने केला होता. ‘चंदीगडमध्ये मे महिन्यात गदर 2 या चित्रपटाच्या अंतिम शेड्युलचं शूटिंग पार पडलं. यावेळी अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही घटना घडल्याचं चाहत्यांच्या कानावर पडलं आणि त्यांनी काळजी व्यक्त केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट्स, कॉस्च्युम डिझायनर्स यांसह इतर काही जणांना योग्य मानधन न मिळाल्याची तक्रार होती. हे खरं आहे. पण झी स्टुडिओजने पुढाकार घेतला आणि सर्वांचं थकलेलं मानधन देण्यात आलं’, असा खुलासा तिने केला होता.

आपल्या या ट्विटमध्ये तिने पुढे लिहिलं होतं, ‘होय राहण्याची व्यवस्था, प्रवासाचा खर्च, जेवणाचा खर्च यापैकी कोणतीच गोष्ट काही कलाकारांना आणि चित्रपटाच्या टीममधील क्रू मेंबर्सना देण्यात आली नव्हती. कारची सोय न केल्याने काही जणांना ताटकळत राहावं लागलं होतं. पण याबाबतही झी स्टुडिओजने खूप मोठी मदत केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्माण झालेल्या समस्यांचं निवारण झी स्टुडिओजने केलं.’

अमीषाचे हे सर्व आरोप अनिल शर्मा यांनी फेटाळले होते. “अमीषाने हे सगळं का म्हटलं ते मला माहीत नाही. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. मी फक्त इतकंच म्हणेन की हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याचसोबत मी अमीषा यांना धन्यवाद म्हणू इच्छितो कारण तिने माझ्या प्रॉडक्शनचं नावलौकिक केलं. यापेक्षा मोठी गोष्ट काय होऊ शकते. आमच्या नव्या प्रॉडक्शनला प्रसिद्ध करण्यासाठी तिचे आभार” असं त्यांनी लिहिलं होतं.