अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा

हा नायक सिनेमाच्या पडद्यावर कधी आपले प्रेम मिळविण्यासाठी झगडत होता. तर, कधी प्रेमात आकंठ बुडून प्रेमवेडा झालेला दिसला. त्याच्या खाजगी आयुष्यातही तो चित्रपटाच्या नायकाचे आयुष्यच जगला. हा नायक आहे सिनेमातला राजबिंडा नायक शशी कपूर...

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण 'तो' आयुष्यभर.... शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
SHAHI KAPOOR 1Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 2:18 PM

मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे महासागराच्या पुरासारखे, ज्वालामुखीच्या लाव्हासारखे आयुष्यात येते. पण जेव्हा ते आयुष्यात येते तेव्हा प्रत्येकजण त्याच्या प्रवाहापुढे, त्याच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो. पण, अनेकांना प्रेम कसे करावे आणि ते कसे टिकवायचे हे माहित नसते. प्रेमात कधी आणि केव्हा शरणागती पत्करावी, साखरेच्या खड्याप्रमाणे पाण्यात कसे विरघळून जावे, एकरूप व्हावे हे प्रत्येकालाच कळत नाही. पण, या कथेतला नायक मात्र त्याला अपवाद आहे. हा नायक सिनेमाच्या पडद्यावर कधी आपले प्रेम मिळविण्यासाठी झगडत होता. तर, कधी प्रेमात आकंठ बुडून प्रेमवेडा झालेला दिसला. त्याच्या खाजगी आयुष्यातही तो चित्रपटाच्या नायकाचे आयुष्यच जगला. हा नायक आहे सिनेमातला राजबिंडा नायक शशी कपूर… प्रत्येक कथेचा नायक जसा शशी कपूर नसतो त्याचप्रमाणे नायिका जेनिफर केंडल ही देखील नसते. शशी कपूर यांची प्रेमकथा एक आगळीवेगळी अशीच आहे.

हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे पृथ्वीराज कपूर. मूकपटामधून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर – ए – अरब हे त्यांनी अभिनय केलेले मूकपट होते. पण, 1931 मध्ये भारताचा पहिला बोलपट ‘आलम आरा’ यात त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती. पृथ्वीराज कपूर 17 वर्षांचे असताना त्यांचा विवाह रामशरणी मेहरा यांच्याशी झाला. रामशरणी मेहरा या तेव्हा 14 वर्षांच्या होत्या. या जोडप्याला छोट्या वयातच 1927 साली राज कपूर हे पहिले अपत्य झाले. त्यानंतर पृथ्वीराज मुंबईला स्थायिक झाले त्यावेळी ते तीन मुलांचे बाप होते. त्यात याहू’ स्टार शम्मी कपूर आणि या कथेचा नायक शशी कपूर हे ते दोन पुत्र होते.

बलबीर राज झाला शशी कपूर…

शशी कपूर यांचा जन्म कलकत्तामध्ये 18 मार्च 1938 रोजी झाला. शशी यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांचा मोठा भाऊ राज कपूर अभिनित आग हा सिनेमा 1948 साली प्रदर्शिर्त झाला. यामध्ये शशी कपूर यांनी राज कपूर यांनी साकारलेल्या पात्राची छोटी आवृत्ती वठवून अभिनयाचा श्री गणेशा केला. त्यानंतर त्यांनी आवारा (1951) मध्ये लहान भूमिका केली होती. 1950 मध्ये त्यांनी अशोक कुमार यांच्यासोबत संग्राम आणि 1953 मध्ये भारत भूषण यांच्यासोबत बाल कलाकार म्हणून भूमिका केल्या. 1940 ते 1954 या काळात त्यांनी जवळपास 19 चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. 1961 मध्ये यश चोप्रा यांच्या धर्मपुत्र चित्रपटामधून त्यांनी नायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

शशी कपूर यांनी 1961 मध्ये नायक म्हणून हिंदी चित्रपटांत पदार्पण केले. त्यांचे बलबीर राज हे नाव त्यांच्या सावत्र आजीने ठेवले होते. एका पंडिताच्या सांगण्यावरुन आजीने हे नाव ठेवले होते. पण, आई रामशरणी मेहरा यांना हे नाव पसंद नव्हते. त्यांना या नावाची चिड होती. त्यामुळे त्या बलबीरला ‘शशी’ नावाने हाक मारु लागल्या आणि पुढे शशी हेच त्यांचे नाव कायम झाले. याशिवाय कपूर घराणे शशी यांना ‘अंग्रेज कपूर’ म्हणायचे. याचे कारण म्हणजे शशी यांचे शिस्तबद्ध जीवन.

शशी यांच्या आयुष्यात ती आली

शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केलो होती. 1953 ते 1960 या काळात शशी कपूर हे वडिलांच्या थिएटरमध्ये काम करत होते. पृथ्वी थिएटरच्या नाटकांचे प्रयोग कलकत्त्याच्या नाट्यगृहात होत होते. त्या नाटकात शशी कपूर अभिनय करत होते. त्यांच्या अभिनय पाहण्यासाठी एक मुलगी दर रोज येत होती. गोरी गोमटी, गुलाबी गाल, जणू अप्सराच होती. ती मुलगी पहिल्या रांगेत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे. शशी कपूर यांना ती मुलगी आवडू लागली.

पृथ्वी थिएटर यांच्यासोबतच त्यावेळी कलकत्यामध्ये शेक्सपियरना ही प्रवासी थिएटर कंपनी आली होती. इंग्लंडच्याचे जेफ्री केंडल हे त्या नाटक कंपनीचे मालक होते. शशी कपूर यांनी त्या कंपनीचा एक फेरफटका मारला. त्यावेळी शशी यांना ती पहिल्या रांगेत बसून नाटक पाहणारी मुलगी दिसली. ती होती जेनिफर केंडल. शेक्सपियरना प्रवासी थिएटर कंपनीचे मालक जेफ्री केंडल यांची ती मुलगी. शेक्सपियरना कंपनीच्या ‘द टेम्पेस्ट’ नाटकामध्ये ती मिरांडाची भूमिका करत होती. जेनिफर हे तेव्हा एक मोठे नावाजलेले नाव होते. ब्रिटिश थिएटरची प्रसिद्ध आणि प्रस्थापित अभिनेत्री होती.

अशी झाली पहिली भेट… आणि प्रेम वाढले…

शशी कपूर यांना पाहण्यासाठी जेनिफर रोज पृथ्वी थिएटरमध्ये नाटक पहायला येत असे. एव्हाना शशी यांना जेनिफर आवडू लागली होती. त्याने चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला लग्नाची मागणी घातली. सुभिराज याने पृथ्वी थिएटर बाहेर दोघांची भेट घडवून आणली. पहिल्या भेटीवेळी शशी कपूर खूप घाबरलेले होते तर जेनिफर मात्र नॉर्मल होती. या पहिल्या भेटीनंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पहाण्यास येऊ लागली. हळूहळू त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. जेनिफर केंडल ही शशी कपूर यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होती हे विशेष.

पृथ्वी थिएटरचे प्रयोग संपवून कंपनी पुन्हा मुंबईत परतली. तर जेनिफर हिची कंपनी हैदराबादला गेली होती. मुंबईत आलेल्या शशी कपूर यांचे जेनिफर हिच्या आठवणीने चेहरा पडला होता. ते नर्व्हस होते. मोठा भाऊ शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली यांचा हा लाडका दीर होता. त्यांनी शम्मी कपूर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. शम्मी कपूर यांनी शशीला विचारले, ‘तुझा चेहरा असा का उतरला? आठवण येतेय का?’ असे म्हणत त्यांनी 100 रुपयांची नोट शशी यांच्या हातात दिली. हैद्राबाद विमानाचे तिकीट तेव्हा 70 रुपये होते. शशी कपूर यांनी लगेच हैद्राबादचे तिकीट काढले आणि जेनिफरची भेट घेतली. शम्मी कपूर आणि गीता बाली यांनी त्यावेळी त्यांना जेनिफरला मुंबईत आणून आई वडिलांची भेट घालून द्यावी असा सल्ला दिला होता.

जेनिफरच्या वडिलांचा विरोध आणि शशी कपूर यांचे लग्न…

जेनिफर हिने वडिलांना त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले. पण, वडीलांनी त्याला नकार दिला. जेनिफर एक प्रस्थापित अभिनेत्री होती. तर, शशी कपूर यांची अजूनही स्वतःची अशी काही ओळख नव्हती. शशी यांचे कपडे, त्यांची देशी उच्चाराची इंग्रजी याची ते सतत खिल्ली उडवत. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा असूनही त्यांची स्वतःची अशी संपत्ती काहीच नव्हती. दुसरीकडे, जेनिफर हिचे वडील दर रोज महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घ्यायचे. हा असंस्कृत भारतीय मुलगा त्यांच्या इंग्रज, सुंदर आणि रुबाबदार मुलीच्या लायकीचा नाही असे वाटून त्यांनी या नात्याला नकार दिला. त्यामुळे जेनिफर आणि शशी यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचे घर, त्यांची संपत्ती, त्यांनी उभारलेले प्रचंड साम्राज्य सोडून जेनिफर हिने शशी कपूर यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हैद्राबाद येथून पळून ते दोघे मोठा भाऊ शम्मी कपूर याचा घरी आले. त्यावेळी शशी यांचे वय 20 वर्ष होते तर जेनिफर 25 वर्षांची होती. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बाली यांनी जेनिफरला पहिल्या भेटीत पसंद केले. पण, आता खरा प्रश्न होता तो वडील पृथ्वीराज कपूर यांच्या परवानगीचा. यातही मोठा भाऊ शम्मी याने पुढकार घेतला. त्यानेच शशी कपूर याचे जेनिफर हिच्याशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने पृथ्वीराज कपूर यांची परवानगी मिळवली आणि 1958 साली मुंबईत शशी कपूर आणि जेनिफर यांचे लग्न झाले.

शशी कपूर यांच्या लग्नाचा दिवस ठरला. त्याचवेळी पृथ्वीराज कपूर हे ‘मुग़ल-ए-आजम’च्या शुटींगमध्ये व्यस्त होते. जयपूरमध्ये त्या चित्रपटाचे क्लायमॅक्सचे शूटिंग होत होते. मुलगा शशी याच्या लग्नासाठी दिग्दर्शक के. आसिफ यांनी त्यांच्यासाठी चार्टर डकोटा विमानाची व्यवस्था केली होती. लग्न झाल्यानंतर त्याच विमानाने पृथ्वीराज पुन्हा जयपूरला परतले.

26 वर्षांचा संसार आणि जेनिफर हिचा मृत्यू…

शशी कपूर आणि जेनिफर यांचे अगदी लहान वयात लग्न झाले. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच नव्हते. पण, आपल्या मेहनतीच्या बळावर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात आपले नाव कमावले. त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. शशी कपूर यांच्यासोबत काम करण्यासाठी त्या काळातील प्रत्येक अभिनेत्री उत्सुक होती. अनेक अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. पण, शशी कपूर यांनी आपला ताबा कधी ढळू दिला नाही. त्यांचे प्रेम कधीही कमकुवत झाले नाही. या दोघांनी लहान वयात निर्णय घेतला पण त्याचा त्यांना कधीही पश्चाताप झाला नाही. त्यांना कुणाल, करण हे मुलगे आणि संजना कपूर अशी तीन अपत्ये झाली.

जेनिफर हिला कर्करोग झाला होता. जगभरातील डॉक्टरांकडे तिला नेले होते. लाखो डॉलर्स खर्च केले. पण, ते सर्व उपचार फोल ठरले. डॉक्टरांनी अंतिम उत्तर दिले होते. जेनिफरच्या जगण्याची आशा नव्हती. जेनिफर हिच्यावर लंडन येथे उपचार सुरु होते. शशी कपूर जेनिफरल भेटण्यासाठी लंडनला गेला. ती जेव्हा लंडनला पोहोचला तेव्हा तो जेनिफरसमोर मोठ्या खंबीरपणे उभा राहिला. पण, जेनिफर हिच्या खोलीमधून तो जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या अश्रूंचा बंध कोसळला. तो मोठ्याने ओरडला इतका मोठ्याने की त्याच्यासोबत असलेल्या मुलांना शशीचा श्वास थांबेल याची भीती वाटत होती. यशस्वी, संपन्न असा बाप अशक्त, असहाय्य झाला होता. अनेक प्रयत्न करूनही अखेर 7 सप्टेंबर 1984 रोजी जेनिफर ही शशीला एकाकी सोडून गेली.

शशी कपूर यांच्या आयुष्याची अखेर…

जेनिफर हिच्यासोबत 26 वर्षांचा संसार केल्यानंतर शशी नेहमीच आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणाशी एकनिष्ठ राहिले. जेनिफर हिच्या मृत्यूनंतर शशी कपूर हे शशी कपूर राहिले नाहीत. ते नेहमीच जेनिफरसोबत प्रामाणिक राहिले. त्याच्या शरीराचा आणि आत्म्याचा एक भाग त्याच्यापासून कायमचा वेगळा झाला होता. जेनिफरने शशीला पूर्णतः जिंकले होते. शशीने तिच्यापुढे पूर्णपणे शरणागती पत्करली होती. शशीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग जेनिफरमध्ये सामावून गेला होता. आपला हरवलेला भाग शोधण्याची त्याने खूप धडपड केली. पण, तो सापडला नाहीच. त्याच्या जीवनात कधीही भरून न येणारी एक असीम पोकळी निर्माण झाली होती.

1984 पूर्वी म्हणजे जेनिफरच्या जाण्यापूर्वी आनंदी, हास्यात बुडालेला, आत्मविश्वास असलेला, पूर्णतेची भावना असलेला शशी कपूर पूर्णता कोसळला होता. जेनिफरला गमावल्याचं दुःख, तोटा आयुष्यभर दूर करता आला नाही. हे नाते त्यांच्यासाठी इतके वैयक्तिक आणि पवित्र होते की ते त्यांनी कधीही कोणासोबतही शेअर केले नाही. जेनिफरच्या मृत्यूनंतर शशी 33 वर्षे जगले पण त्यांच्या आयुष्यात आता तो आनंद उरला नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या काळातला सर्वात रोमँटिक हिरो, ज्याच्या गालावरचे डिंपल्स आणि मोहक स्मित मुलींना प्रेमात पाडत होते तोच आता आयुष्याला कंटाळला होता. अखेर 4 डिसेंबर 2017 रोजी या महान अभिनेत्याने आपला देह ठेवला. जगात अगणित प्रेमकथा आहेत. पण, शशी कपूर आणि जेनिफर यांची प्रेमकथा वाचली, पाहिली आणि ऐकली तर तिच्यापुढे आपले डोके आदराने झुकतेच झुकते.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.