“किर्तनकाराने अशा ठिकाणी जावं हे..”; ‘बिग बॉस मराठी’त जाण्याविषयी मठाधिपती पुरुषोत्तमदादा पाटील काय म्हणाले?

| Updated on: Aug 04, 2024 | 11:44 AM

किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने आधी मित्रांना आणि कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण त्यांनी बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय का घेतला, याविषयी खुलासा केला आहे.

किर्तनकाराने अशा ठिकाणी जावं हे..; बिग बॉस मराठीत जाण्याविषयी मठाधिपती पुरुषोत्तमदादा पाटील काय म्हणाले?
Purushottam Dada Patil
Image Credit source: Instagram
Follow us on

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचं किर्तन ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड इथल्या मठांचे मठाधिपती पुरुषोत्तमदादा पाटील यांनी लाखो भक्तांच्या हृदयात घर केलं आहे. किर्तनकाराचा वारसा लाभलेले पुरुषोत्तमदादा आजच्या तरुणांचे मार्गदर्शक आहेत. आपल्या कलेच्या आणि विचारांच्या बळावर दादांनी आता ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. दादांच्या कीर्तनातून प्रकट होणाऱ्या संदेशामुळे त्यांचे भक्त त्यांच्या प्रत्येक शब्दाचं अनुकरण करतात. अशा प्रभावी व्यक्तिमत्वाने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. दादा त्यांच्या प्रवासाबद्दल म्हणाले, “मी सर्वसामान्य घरातून आलो आहे. परंतु वारकऱ्यांची कीर्तनाची परंपरा मी पुढे चालवली आहे. माणूस एकांताला खूप घाबरतो. पण तसं पाहायला गेले, तर हाच एकांत मला ‘बिग बॉस’च्या घरात वाटतो. कारण बिग बॉसच्या घरात आपण एकटे असतो म्हणून मी तिकडे जात आहे.”

याविषयी ते पुढे म्हणाले, “माझ्या मित्रांनी आणि घरच्यांनी जेव्हा माझा ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा निर्णय ऐकला, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्याचं कारण म्हणजे एका कीर्तनकाराने अशा मनोरंजनाच्या प्लॅटफॉर्मवर जाणं थोडं अनपेक्षित आहे. पण याबद्दल मी त्यांना म्हणालो, बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यावर भांडणच होतात, अशी लोकांची मानसिकता झाली आहे. एका कीर्तनकाराने अशा व्यासपीठावर जावं का, असा प्रश्न लोकांना पडणारच. पण मला असं वाटतं की, वारकरी संप्रदायाचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘बिग बॉस’ हा उत्तम पर्याय आहे.”

हे सुद्धा वाचा

“मला जर ‘बिग बॉस’च्या घरात काही घेऊन जाण्याची संधी मिळाली तर मी माझे आध्यात्मिक ग्रंथ घेऊन जाईन. तसंच ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी शेवटचा कॉल माझ्या बाबांना केला. माझ्या आजोबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांना जाऊन 12 वर्षे झाली आहेत आणि त्यांची पुण्यतिथी याच कालावधीत येते. त्यामुळे माझ्या बाबांना दुःख होतं की यावेळी मी तिथे नाही. त्याच बरोबर मला एवढी मोठी संधी मिळाली याचा आनंद देखील होताच आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढील प्रवास सुरू केला”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

रितेश देशमुख यांच्याबद्दल बोलताना दादा म्हणाले की ,”रितेश देशमुख हे नाव समोर आल्यावर माऊली हाच शब्द डोळ्यांसमोर येतो. कारण मी माऊलीच्या खूप जवळचा आहे. माझ्या हातामध्ये ब्रेसलेट आहे ते देखील माऊलीचं आहे. तसंच हातावर टॅटू काढला आहे तो देखील माऊलीचाच आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी माऊलीच्या गावातला आहे. रितेश देशमुख यांना पहिल्यानंतर मी माऊलीमय झालोय.”

बिग बॉसच्या घरात सर्व कामं स्पर्धकांनाच करावी लागतात. याविषयी पुरुषोत्तमदादा पुढे म्हणाले,”घरातल्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मला जेवण बनवता येत नाही. पण बाकीचं काम मी करणार. माझ्यातील स्ट्राँग पॉईंट असा की, एखादी गोष्ट मला पाहिजे असेल तर मी ती मिळवणारच आणि विकनेस बघायला गेलो तर मी खूप भावनिक आहे.”