खुपते तिथे गुप्ते | अमोल कोल्हे यांना काय-काय खुपतं? पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

| Updated on: Jul 17, 2023 | 9:03 PM

अमोल कोल्हे यांना 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय घडामोंडींशी संबंधित प्रश्नांचा देखील समावेश आहे. या प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.

खुपते तिथे गुप्ते | अमोल कोल्हे यांना काय-काय खुपतं? पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : ‘झी मराठी’ वाहनीचा ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा नवा पर्व देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येवून गेले. त्यानंतर आता येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे या कार्यक्रमात येणार आहेत. ‘झी मराठी’कडून अमोल कोल्हे यांच्या मुलाखतीचा एक साडेसहा मिनिटांचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना खुपणारे टोकदार प्रश्नही विचारण्यात आले, त्यावर ते आपली रोखठोक मतं मांडताना दिसत आहेत.

अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना सातत्याने उधाण येतं. याबाबत अमोल कोल्हे यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यामुळे उगाच नागर खांद्यावर घेऊन चालत नाही. आधी आभाळ बघून मग जमीन कधी नागरायची ते ठरवायला लागतं. हे राजकीय उत्तर आहे. पण खरं उत्तर हे आहे की….”, असं उत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. अमोल कोल्हे यांचं अर्धवटच उत्तर दाखवण्यात आलं आहे. त्यांचं सविस्तर उत्तर हे येत्या रविवारी प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे.

शरद पवार यांनी जातीचं राजकारण आणलं? कोल्हे म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांनी जातीचं राजकारण आणलं होतं, असा आरोप एकदा केला होता. याबाबत अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शरद पवार यांनी जातीचं राजकारण आणलं असं कोणी म्हणत असेल तर ज्या पवारांनी 33 टक्के महिलांचं आरक्षण सुरु केलं त्यांनी ती महिला कोणत्या जातीची आहे? हा विचार केला नाही.”

हे सुद्धा वाचा

“शरद पवारांनी हिंजवडीत आयटी पार्क स्थापन केलं, त्यानंतर 20 वर्षांनी आयटी प्रोफेशनल विचारतो की, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? ज्या माणसांनी हे सगळं आणलंय त्याला आपण म्हणणार?”, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे, अजित पवार की सुप्रिया सुळे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं.

अमोल कोल्हे यांचा लोकशाहीला फोन

या कार्यक्रमात कोणत्याही एका व्यक्तीला काल्पनिक फोन करुन संभाषण करण्याची टास्क असते. यावेळी अमोल कोल्हे थेट लोकशाहीला फोन करतात. यावेळी त्यांचं फोनवरील संभाषण हे अंगावर शहारे आणणारं आहे.

अमोल कोल्हे फोनवर नेमकं काय बोलतात?

“हॅलो! लोकशाहीच ना? नाही आवाज थोडा खाली गेला म्हणून विचारतोय. तू असण्यात, टिकण्यात 140 कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. काही प्रश्न मनात होते म्हणून म्हटलं फोन करावा. प्रश्न निर्माण झाला तरी ते विचारण्याचा अधिकार घटनेने दिलाय. पण ते विचारण्याची आज मुभा आणि मोकळीक नाहीय. प्रश्न विचारले की, ट्रोलधाड येते आणि देशद्रोहाचा शिक्का मारुन जाते”, अशी खंत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

“सीयाचीनला मायनस ट्वेन्टी डिग्री सेल्सिअसमध्ये देशाच्या सीमांचं रक्षण मुलगा करत असतो. तर त्याचा 75 वर्षाचा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत त्याच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करत असतो. त्या आंदोलकांपैकी काही जणांना मग्रुर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठूरपणे चिरडलं जातं तेव्हा प्रश्न निर्माण होतो, कुठल्या तोंडाने म्हणायचं. जय जवान जय किसान”, असं अमोल कोल्हे फोनवर बोलताना व्हिडीओत दिसत आहेत.

अमोल कोल्हे यांनी नाट्यगृहाच्या खालचा ‘तो’ किस्सा सांगितला

“यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या खालीच मला दिग्गज नाट्यकर्मींनी आवर्जून सांगितलं होतं की, प्लीज तू महाराजांची भूमिका करु नको. ती कधीच फळत नाही. जेव्हा मी रोल केला तेव्हा मी जेमतेम 28 वर्षांचा होतो. त्या 28 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आपल्याला 28 व्या वर्षी संधी मिळतेय. चान्स घ्यायला काय हरकत नाही”, असं अमोल कोल्हे यांनी सांगितला.