त्यामुळे मला कोणीच आवडत नाही; 47 वर्षांची अभिनेत्री अद्यापही अविवाहीत; लग्न का करायचं नाहीये?
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाबद्दल तिचे विचार मांडताना तिला लग्न करायला का आवडत नाही याबद्दलचे स्पष्ट मत मांडले आहे. ही अभिनेत्री 47 वर्षांची झाली असली तरी तिला अद्यापही लग्न करण्याची इच्छा होतं नाहीये. यामागची अनेक कारणं तिने सांगितली आहेत.
![त्यामुळे मला कोणीच आवडत नाही; 47 वर्षांची अभिनेत्री अद्यापही अविवाहीत; लग्न का करायचं नाहीये? त्यामुळे मला कोणीच आवडत नाही; 47 वर्षांची अभिनेत्री अद्यापही अविवाहीत; लग्न का करायचं नाहीये?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-180.jpg?w=1280)
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची लव्ह लाइफ, अफेअर्स , घटस्फोट आणि लग्न यांच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. तर काही सेलिब्रिटी लग्न न करता राहणंही पसंत करतात. प्रत्येक सेलिब्रिटीचे जगण्याचे फंडे, विचार हे नेहमी वेगवेगळे असतात. अशीच एक अभिनेत्री आहे जिचे लग्नाबद्दल, प्रेमाबद्दल फार वेगळे विचार आहेत.
47 वर्षांच्या अभिनेत्रीला लग्न आवडत नाही…
सध्याच्या काळात लग्नाच्या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीने तिचं लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. या अभिनेत्रीला लग्नापेक्षा किंवा रिलेशनपेक्षाही एकट राहणं जास्त आवडतं. त्यामुळे तिने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला आहे. पण त्यामागची कारणेही तिने स्पष्टपणे सांगितली आहेत.
ही अभिनेत्री म्हणजे ‘बिग बॉस 11’ची विजेती आणि ‘भाभीजी घर पर हैं’ मधून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे आहे. शिल्पा 47 वर्षांची आहे मात्र ती अजूनही अविवाहित आहे. तिचं नाव काही अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र तिने अद्याप लग्न केलेलं नाही. तिने लग्न न करण्यामागची कारणेही सांगितली आहेत.
तसेच शिल्पा पुढे म्हणाली, ‘अनेक लोक लग्नानंतर 10 वर्षांनंतरही बोलतात की आमच्यात सुसंगता नाही. मला हे सगळं खोटं वाटतं. हे खरं तर दोन्ही बाजूंकडून असतं. कमी जास्त हे नात्यात होतच असतं. माझी फार सोशल लाईफ नाही. त्यामुळे मला कोणी आवडतच नाही. माझ्यासारखे लोक आम्ही एकटेच खूश असतो. जे भूतकाळात झालंय ना त्यानंतर असं वाटतं आता आपल्याला कोणीच नको. आपण एकटेच बरे. एकटं राहण्याची सवयही होते. जर उद्या कोणी आयुष्यात आलंच आणि जे चाललंय ते बिघडलं तर? त्यापेक्षा जे आहे ते बेस्ट आहे.’ असं म्हणत तिने लग्नावर विश्वास नसल्याचं मत मांडलं आहे.
View this post on Instagram
कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव येतो का?
कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव येतो का असा प्रश्नही शिल्पाला विचारण्यात आला. त्यावर तिने अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं आहे’ ‘ माझ्यावर लग्नाचा कधीच दबाव नव्हता. माझ्या बाबांनाही माझ्यावर विश्वास आहे. ते म्हणतात जे तुला चांगलं वाटतं ते कर. मला वाटतं मुलांवर लग्न कर असा हट्ट धरणाऱ्या कुटुंबाला मी आजच्या काळात मागासलेलं म्हणेन. कारण आजकाल सगळं बदललंय. लग्नाचा नेमका अर्थ लग्न करणाऱ्या त्या दोघांनाही माहित नसतो. नवरा बायको दोघंही स्पर्धेत उतरले आहेत.’
‘समाजाने आधीच स्त्रीचं काम काय आणि पुरुषांचं काय हे ठरवून दिलं आहे. मग यातच सगळी गडबड होते. मला एकटंच राहायचंय असं म्हणून मी स्वत:ला काही ब्लॉक ठेवलेलं नाही की. “करायचं तर मी लग्नच करेन. लिव्ह इन रिलेशनशिप ही मला पटत नाही. जर मला चांगला मुलगा मिळाला तर करेन. पण लग्न हेच सर्वस्व नाही. मी प्रवाहानुसार चालेते. जे होईल जेव्हा व्हायचं तेव्हा होईल असा माझा दृष्टिकोन आहे.’
असं आपलं मत व्यक्त करत शिल्पाने लग्नाबद्दलचे तिचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत.