Nitin Desai | नितीन देसाई यांच्या निधनावर सुनील शेट्टीने सोडलं मौन; म्हणाला..

| Updated on: Aug 07, 2023 | 8:19 AM

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यादरम्यान अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनील शेट्टीने नुकतंच मानसिक स्वास्थ्याशी संबंधिक एक ॲप लाँच केलं.

Nitin Desai | नितीन देसाई यांच्या निधनावर सुनील शेट्टीने सोडलं मौन; म्हणाला..
Nitin Desai and Suniel Shetty
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे कलाविश्वातील अनेकांना मोठा धक्का बसला. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यादरम्यान अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनील शेट्टीने नुकतंच मानसिक स्वास्थ्याशी संबंधिक एक ॲप लाँच केलं. यादरम्यान त्याने कलाकारांच्या आयुष्याविषयी मोकळेपणे वक्तव्य केलं. “आपण सर्वजण आयुष्याच्या एका टप्प्यावर तणावग्रस्त होतो. मात्र आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे की त्यातून आपण बाहेर येऊ शकतो. आपल्या समस्या जवळच्या मित्रासमोर किंवा एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणे मांडता आल्या पाहिजेत. कदाचित त्यातूनच एखादा मार्ग निघू शकतो”, असं तो म्हणाला.

नितीन देसाई याविषयी काय म्हणाला सुनील शेट्टी?

नितीन देसाई यांच्याविषयी बोलताना सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “देसाई हे सर्वांत प्रतिभाशाली कला दिग्दर्शकांपैकी एक होते. ती अशी एक कोणती गोष्ट होती, ज्यामुळे त्यांनी इतक्या टोकाचा निर्णय घेतला, हा सर्वांत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. असं म्हटलं जातं की देवाला सर्वांत आवडती लोकं त्याच्या जवळ हवी असतात. त्यांना यांची गरज होती का? मला माहीत नाही, पण मी सहवेदना व्यक्त करतो.”

सुशांत सिंह राजपूतबद्दल केलं वक्तव्य

सुनील शेट्टीने या मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयीही वक्तव्य केलं आहे. “तो एक अद्भुत मुलगा होता. त्याने त्याच्या आयुष्यात बरंच काही यश संपादन केलं होतं आणि मग देव त्यालाही घेऊन जातो. असं टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्याची मनस्थिती कशी होती, तो काय विचार करत होता? आपण त्याच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. मात्र आपल्या ओळखीत जर कोणी अशा प्रकारच्या तणावाचा सामना करत असेल, तर आपण त्यांची मदत करायला हवी. आपण सतत त्यांना फोन करून त्यांच्या विचारपूस केली पाहिजे”, असं तो पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.