हिवाळाच्या दिवसात तुमचे हात-पाय काळवंडतात का?
थंडीच्या दिवसात बदलत्या हवामानामुळे त्वचेची कमी काळजी घेणे तसेच कोल्ड क्रीमचा वापर अधिक केल्याने अनेकांचे हातपाय काळे पडू लागतात. यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, पण तुम्ही घरगुती उपायांनीही काळवंडलेली त्वचेची समस्या दूर करू शकतात.
हिवाळा हा ऋतू अनेकांच्या आवडीचा ऋतू आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाहेरील वातावरणात गारवा आणि आरामदायीपणा असला तरी त्वचेसाठी हा ऋतू अनेक समस्या घेऊन येतो. तसेच या ऋतूमध्ये बाहेरील वातावरणात थंडावा असल्याने आपल्या त्वचेत कोरडेपणा वाढतो, त्यामुळे हात-पायाची त्वचाही काळी आणि निर्जीव दिसते. अनेकदा हिवाळ्यात लोक त्वचेची काळजी घेतात पण हात-पायांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. अशा तऱ्हेने त्वचेचा रंग गडद दिसू लागतो आणि त्याची चमक हरवून जाते. अनेकजण याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात, पण वेळीच लक्ष न दिल्याने त्वचा अधिक काळी पडून ही समस्या वाढू शकते.
बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम आणि उत्पादनांचा वापर त्वचेचा काळेपणा दूर करतो. पण प्रत्येकाला बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरणे शक्य नसते आणि त्यात असणारी रसायने कधीकधी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशावेळी काही लोक यासाठी घरगुती उपाय करण्यास सुरुवात करतात, जे नैसर्गिक आहेत आणि परिणामकारकही आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला एक सोपा आणि नैसर्गिक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यात हात-पायांची काळी त्वचा तर साफ होईलच, शिवाय ती मुलायम आणि चमकदार ही होईल.
साहित्य
२ चमचे लिंबाचा रस,
२ चमचे मध
१ चमचा हळद पावडर
१ चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल
पद्धत
एका बाऊलमध्ये लिंबाचा रस, मध, हळद आणि खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल चांगले मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या हात-पायाच्या काळवंडलेल्या भागात लावा. यानंतर हलक्या हातांनी ५-१० मिनिटे मसाज करा. त्यानंतर असेच 20-30 मिनिटे ठेवा, जेणेकरून ते त्वचेत खोलवर जाईल. यानंतर हात आणि पाय कोमट पाण्याने धुवून घ्या आणि नंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा.
लिंबू, मध आणि हळदीचे फायदे
1. लिंबामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. लिंबाचा रस नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून कार्य करते आणि त्वचेच्या काळवंडलेला भागावर लिंबाचा रस लावल्यास त्वचा चमकदार करते.
2. मधात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवतात. यामुळे त्वचेची चमक परत येण्यास मदत होते.
3. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेचा काळेपणा कमी करतात. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होऊन चमकदार होते.
४. खोबरेल तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि हिवाळ्यात कोरडेपणापासून वाचवते. यामुळे त्वचा मुलायम आणि लवचिक राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)