पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधात मोठी कारवाई, 30 दहशतवाद्यांना कंठस्नान
पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये तीन वेगवेगळी ऑपरेशन्स करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
![पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधात मोठी कारवाई, 30 दहशतवाद्यांना कंठस्नान पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधात मोठी कारवाई, 30 दहशतवाद्यांना कंठस्नान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pakistan.jpg?w=1280)
खैबर पख्तूनख्वा प्रांतात तीन वेगवेगळ्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. पाकिस्तानमधील लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. लक्की मारवत जिल्ह्यात 18 दहशतवाद्यांना ‘नरकात पाठवण्यात आले’, तर करकमध्ये आठ दहशतवादी मारले गेले. लक्की मारवत चकमकीत सहा दहशतवादी जखमी झाल्याचे लष्कराने एका निवेदनात नमूद केलं.
ज्या ठिकाणी ही कारवाी करण्यात आली त्या घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली. यापूर्वी 17 जानेवारी रोजी खैबर जिल्ह्यातील तिराह भागात गुप्तचरांवर आधारित कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते. तर खैबर जिल्ह्यातील बाग भागात झालेल्या आणखी एका चकमकीत सुरक्षा दलांनी नेता अझीझ उर रहमान उर्फ कारी इस्माईल आणि मुखलिस यांच्यासह चार दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराने केलेल्या या कारवाईत दोन दहशतवादी जखमी झाले होते.
दहशतवाद मुळापासून मिटवायचा आहे
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी 30 दहशतवाद्यांना ठार मारणे ही एक महत्त्वाची कारवाई असल्याचे म्हटले. दहशतवादाचा समूळ नायनाट होईपर्यंत सुरक्षा दलांची कारवाई सुरूच राहील, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनीही सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टीटीपीविरोधात लष्कराची मोहीम
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरोधात कारवाया तीव्र केल्या आहेत. CRSS च्या रिपोर्टनुसार, 2024 हे वर्ष पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी सुरक्षा दलांसाठी या दशकातील सर्वात घातक वर्ष होते. या वर्षी 444 दहशतवादी हल्ले झाले, ज्यात 685 लोकांचा मृत्यू झाला.