वायू आणि पाणी प्रदुषणाने आयुष्य कमी होतंय, मग फाशीची गरज काय? निर्भया बलात्कारातील दोषीचा युक्तीवाद
देशभरात संतापाची लाट तयार करणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंह याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे (Convicted criminal of Nirbhaya rape).

नवी दिल्ली : देशभरात संतापाची लाट तयार करणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंह याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे (Convicted criminal of Nirbhaya rape). यात त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी केलेला युक्तीवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोषी अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दावा केला आहे की याच युक्तीवादामुळे फाशीची शिक्षा रद्द करण्याची याचिका सहजपणे मंजूर होईल (Convicted criminal of Nirbhaya rape).
आपल्या याचिकेत दोषी अक्षयने म्हटले आहे, “दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्तरावर गेली आहे. हवा प्रदुषणामुळे दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झाली आहे. इतकंच नाही तर दिल्लीतील पाण्यात देखील विष मिसळलं जात आहे. हे वास्तव सरकारने नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालातून सिद्ध झालं आहे. दिल्लीत हवा आणि पाण्याबाबत काय घडत आहे याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. यामुळे आधीच आयुष्य अत्यंत कमीकमी होत आहे. अशा स्थितीत फाशीच्या शिक्षेची गरज काय?”
अक्षय कुमार सिंह 2012 मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध झाला आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी रात्रीच्या वेळी दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण झाले. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन झाले. यावेळी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी झाली. न्यायालयाने देखील हा निर्घृण गुन्हा असल्याचं म्हणत आरोपींना फाशीची शिक्षा दिली. यातील दोषी अक्षयच्या शिक्षेला ट्रायल कोर्टापासून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वाच्च न्यायालयाने देखील कायम ठेवलं आहे.