आधी कबुतराच्या अंड्यांचं ऑमलेट खाल्लं, नंतर आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
पुणे : विद्येची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक विचित्र घटना घडली. कबुतराच्या अंड्यांचं ऑमलेट खाऊन एक तरुण वेडा झाला आणि त्या परिस्थितीत त्याने आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. पुण्याच्या लोहगाव परिसरात ही घटना घडली. येथे राहणारा 32 वर्षीय अर्णव मुखोपाध्यायने त्याच्या राहत्या घरी आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. अर्णव मुखोपाध्याय हा पुण्यातील […]

पुणे : विद्येची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक विचित्र घटना घडली. कबुतराच्या अंड्यांचं ऑमलेट खाऊन एक तरुण वेडा झाला आणि त्या परिस्थितीत त्याने आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. पुण्याच्या लोहगाव परिसरात ही घटना घडली. येथे राहणारा 32 वर्षीय अर्णव मुखोपाध्यायने त्याच्या राहत्या घरी आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.
अर्णव मुखोपाध्याय हा पुण्यातील व्होडाफोन कंपनीत कार्यरत होता. तो मुळचा कोलकाताचा होता आणि नोकरीसाठी पुण्यात वास्तव्यास होता. तो पुण्याच्या लोहगाव परिसरातील एका इमारतीत आपल्या पत्नीसोबत राहात होता.
अर्णवच्या फ्लॅटच्या खिडकीमध्ये कबुतराने घरटं बनवलं होतं. या घरट्यात त्या कबुतराने अंडी दिली होती. अर्णवने त्या घरट्यातून आठ अंडी काढून घेतली आणि त्यांचं ऑमलेट बनवलं. कबुतराच्या अंड्यांचं ऑमलेट खाण्यास त्याला त्याच्या पत्नीने विरोधही केला, मात्र अर्णवने ऐकलं नाही. त्याने ते ऑमलेट खाल्लं. काही वेळानंतर अर्णव विचित्र वागणूक करु लागला. काहीतरी पुटपुटू लागला. मला कबुतराचं भूत दिसतंय, माझ्या अंगात कबुतराचं भूत आलंय, मी उडणार आहे, कुणी तरी मला बोलवतंय असं म्हणत तो घरात इकडेतिकडे पळू लागला.
पतिच्या अशा वागण्याने घाबरलेल्या पत्नीने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याने फ्लॅटच्या गॅलरीचा दरवाजा उघडला आणि आठव्या मजल्यावरुन थेट आकाशात झेप घेतली. पण तो खाली पार्किंगमध्ये असलेल्या एका चारचाकी गाडीवर आदळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या तपासात मात्र एक वेगळीच माहिती समोर आली. अर्णवने आत्महत्येपूर्वी मद्य प्राशन केलं होतं. तसेच त्याने कबुतराच्या आठ अंड्यांचं ऑमलेट करुन खाल्लाने दारूची नशा आणि कबुतरांची आठ अंडी याचा विपरीत परिणाम त्याच्यावर झाला आणि त्याने नशेतच आठव्या मजल्यावरुन उडी घेतली. तर गेल्या दोन दिवसांपासून अर्णव तणावाखाली होता, अशी माहिती अर्णवच्या पत्नीने दिली.
लोहगाव पोलीस या प्रकरणाचा चौफेर तपास करत आहेत. मात्र, कबुतराच्या अंडींचं ऑमलेट खाल्ल्याने घडलेल्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.