Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टकाटक ऑफिस, मातोश्रीचे खास, दानवेंची गाडी सुसाट, राऊतांनी टाकला भलताच गिअर! काय घडतंय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात? Special Report

प्रदीर्घ कारकीर्द गाजवल्यानंतर औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंचा प्रभाव कमी होतोय, असे चित्र असतानाच संजय राऊतांच्या एका वक्तव्यानं औरंगाबादमधील शिवसेनेत पुन्हा कुजबूज सुरु झाली आहे. तरुण, सक्रीय चेहरा असलेल्या अंबादास दानवेंसाठी हे संकेत असल्याचं मतही जाणकार व्यक्त करत आहेत.

टकाटक ऑफिस, मातोश्रीचे खास, दानवेंची गाडी सुसाट, राऊतांनी टाकला भलताच गिअर! काय घडतंय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात? Special Report
औरंगाबादमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात निघालेला आक्रोश मोर्चा
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 4:58 PM

औरंगाबादः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या शिवसेनेचं (Aurangabad ShivSena) वातावरण ऐन हिवाळ्यात चांगलंच तापलंय. दोन दिवसांपासून अवकाळी ढग दाटून आल्यानं शहराचं तापमान वाढलंय, तसं शहरातल्या शिवसनेतंही गरमागरमी वाढल्याचं चित्र आहे. निमित्त ठरलं शहरात नुकताच निघालेला भव्य आक्रोश मोर्चा. 13 नोव्हेंबर रोजी क्रांतिचौकातून गुलमंडीपर्यंत शिवसेनेनं भव्य मोर्चा (Aurangabad Rally) काढला. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे वाढलेल्या महागाईविरोधात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शहरातील मातब्बर नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मोर्चा निघाला. पंधरा दिवस आधीपासूनच शहरात यासाठी वातावरण निर्मिती सुरु झाली होती. शहरातल्या 15 हजार घरांवर भगवा भडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या ‘कथित’ विकासकामांची ग्वाही देणारे भव्य विकासदीप लक्षवेधी ठिकाणी टांगण्यात आले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांचं तोंडभरून कौतुकही खासदार संजय राऊत यांनी केलं. मग गाडी अडली कुठं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गाडी अडली ती संजय राऊत यांच्या एका वक्तव्यावर.

Aurangabad morcha

शिवसेननेने औरंगाबादमध्ये नुकताच महागाईविरोधात काढलेला भव्य मोर्चा

असं काय बोलले संजय राऊत?

शिवसनेच्या आक्रोश मोर्चात राऊतांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानं आलेल्या महागाईवर चांगलंच तोंडसुख घेतलं. पण हे करताना त्यांनी खैरेंना उद्देशूनही काही वक्तव्य केलं. संजय राऊत म्हणाले, ‘खैरेजी, तुम्ही लोकसभेत नाहीत, म्हणून अशी स्थिती उद्भवलीय. तुम्ही तिथे असता तर मोर्चा काढायची वेळच आली नसती. आम्हाला तुम्ही लोकसभेत हवे आहात.’ आता या वक्तव्याचे कुणी कितीही अर्थ काढले तरी एक अर्थ तर स्पष्टच आहे. खैरे यांनी लोकसभेत येण्याची तयारी करावी. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राऊतांचं हे वक्तव्य सध्या औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. गाडी इथपर्यंतही सुरळीत आहे असंच दिसतंय. पण नेमका इथंच गिअर बदललाय. गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी झटणारे नेते म्हणलं तर हिरीरीनं नाव पुढे आलेलं दिसलं ते अंबादास दानवे यांचं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मातोश्रीच्या अगदी निकटवर्तीय असे औरंगाबादमधले नेते म्हटलं तर अंबादास दानवेंचं नाव कुणीही घेऊ लागलंय.. अगदी कमी वेळात त्यांनी शिवसेनेच्या श्रेष्ठींच्या मनात आणि राजकारणात जे स्थान मिळवलंय तेही नाकारण्यासारखं नाहीच. कोणतेही कार्यक्रम, आंदोलनं, सभा-संमेलनं, निवेदनं असतील तरीही दानवे पुढे असतात. त्यामुळे आता आमदारकीनंतर पुढील प्रगतीच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीची इच्छा त्यांच्याही मनात असेलच हेही नाकारता येण्यासारखे नाही. याच महत्त्वाकांक्षेपायी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी थाटलेलं ऑफिसही सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

Ambadas Danve, Aurangabad

शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे सुसज्ज ऑफिस औरंगाबादमध्ये लक्षवेधी ठरतंय.

टकाटक ऑफिस, कॉर्पोरेट्सनाही लाजवणारं!

क्रांतीचौकातून गुलमंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूविकास बँकेच्या जागेवर भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी थाटलेलं ऑफिस सध्या शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः ज्यांनी हे ऑफिस आतून पाहिलंय त्यांचे तर डोळेच गरगरायला लागले. कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी या कार्यालयाचा झगमगाट आहे. कार्यालयाच्या आत गेल्यावर रिसेप्शन, पीएचं केबिन, दानवेंचं केबिन, कॉन्फरन्स हॉल, फर्निचर वगैरे सगळं काही टकाटक. अगदी 100 लोकांना बसता येईल एवढा भव्य एसी कॉन्फरन्स हॉल इथं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयाचं महिन्याचं भाडच तब्बल 72,000 रुपये आहे. नक्कीच भविष्याचे काही संकेत असतील, काही महत्त्वाकांक्षा असतील, काही ग्रीन सिग्नल मिळाले असतील, म्हणून तर दानवेंची गाडी एवढी सुसाट चाललीय, अशी चर्चा काही दिवसांपासून म्हणजे हे ऑफिस थाटल्यापासून होती. पण राऊतांच्या या वक्तव्यानं जरा गिअर बदलेला दिसतोय. यावर दानवेंची प्रतिक्रिया आम्ही विचारली.

काय म्हणाले अंबादास दानवे?

खैरे यांनी लोकसभेची तयारी करावी, असे सूतोवाच संजय राऊत यांनी केलेले असले तरीही अंबादास दानवे यांनी यावर मोघम प्रतिक्रिया नोंदवली. मुळात कुणाला कशाचं तिकिट द्यायचं, हा अधिकार आमच्या पक्षात फक्त शिवसेनाप्रमुखांना असतो. मी जिल्हाप्रमुख असून जिल्हा स्तरावरची तिकिटं देऊ शकत नाही, त्यामुळे अजून निवडणुकीला खूप अवकाश आहे. लोकसभेच्या तिकिटासाठीचा निर्णय अखेर उद्धव ठाकरे यांचाच असेल. त्यामुळे तो जो निर्णय घेतील, तो योग्य असेल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

तिसरा माणूसही शर्यतीत पुढे जाऊ शकतो, जाणकारांचं मत

शहरातील राजकीय विश्लेषक सारंग टाकळकर म्हणातत, शिवसेनेत कधी काय होईल, याचा नेम नाही. पण 4 वेळा खासदार झालेले चंद्रकांत खैरे यांनी आता थांबावं, अशी अनेकांची इच्छा आहेत. खैरेंच्या तुलनेत अंबादास दानवे तरुण आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षाही मोठ्या आहेत. पण त्यांना अजून राज्याच्या राजकारणातही बराच पल्ला गाठायचाय. खैरेंएवढा अनुभव येण्यासाठी त्यांना बरीच कामं करावी लागतील. लोकसभा निवडणुकीसाठी आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे खैरे आणि दानवेंच्या या स्पर्धेत शिवसेनेच्या राजकारणात असलेला तिसरा चेहराही पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

बालेकिल्ल्याची वीटन् वीट मजबूत करणारे खैरे

Chandrkant Khaire, Aurangabad

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे संस्थापक सदस्य असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला उभारण्यासाठी प्रत्येक वीट अगदी मजबुतीनं बसवली. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा त्यांनीच औरंगाबादमधील गुलमंडी येथे स्थापन केली. त्यांचे वडील भाऊराव हे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते होते. तरीही शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून खैरे पक्षासोबत आहेत. 1985 मध्ये खैरे हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख झाले. तेव्हापासून ते औरंगाबादच्या राजकाराणात सक्रीय झाले. 1988 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीत खैरे यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांचा पक्षातील दबदबा वाढतच गेला. 1990 मध्ये त्यांनी आमदराकीची निवडणूक लढवून ती विजयी करून दाखवली. 1995 च्या निवडणुकीत खैरेंनी राजेंद्र दर्डा यांचा पराभव करत खासदारकी आणि मंत्रीपदही मिळवले. त्यानंतर 2019 पर्यंत खैरे यांनी सलग चार वेळा औरंगाबाद लोकसभा मतदार संघावर राज्य केले. पण मागील लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून मराठवाड्यात खैरेंच्या युगाचा अंत सुरु झाला, अशी चर्चा सुरु झाली.

शिवसेनेचा तरुण, सक्रिय चेहरा- अंबादास दानवे

Ambadas Danve, Aurangabad

गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर असलेल्या अंबादास दानवे यांनी पक्ष संघटनासाठी विशेष प्रयत्न केले. शिवसेनेच्या राज्यस्तरावरील आंदोलनात त्यांनी थिंक टँक म्हणून कार्य केले. शेतकरी आत्महत्या, पिकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, आदी कामात सक्रिय सहभाग घेतला. याचाच परिणाम म्हणून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. आमदार झाल्यावर दानवेंना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याची मागणीही झाली. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत तर दानवे यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे यांनी उघड भूमिका घेतली. पण त्याचा फार परिणाम झाला नाही. दानवे संचालक म्हणून निवडून आले. जिल्हा बँकेच्या संचालक पदावर निवडून आल्यानंतर शिवसेनेने प्रथमच त्यांना शिवसेनेचे पक्ष प्रवक्तेपद दिले. संजय राऊत आणि अरविंद सावंत हे शिवसेनेचे दोन प्रमुख प्रवक्ते असून त्यानंतरच्या आठ-दहा नावांमध्ये दानवे यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं.

तसं तर संजय राऊत यांनी औरंगबाादच्या दौऱ्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनीनंही बरंच जुळवाजुळवीचं काम केलंय. लोकसभेत तुम्ही हवे आहात, असे वक्तव्य खैरेंसाठी केलं. तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सत्कार सोहळ्यातही त्यांनी खैरेंवर स्तुतीसुमनं उधळली. शनिवारच्या भव्य मोर्चाचे श्रेय आमदार अंबादास दानवेंना दिलं. आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्याशीही आस्थेवाइकपणे संवाद साधला. दोन वर्षांपासून दुरावलेल्या किशनचंद तनवाणींच्या संपर्क कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. यातून स्थानिक गटबाजी थांबवण्याचे संकेत राऊत यांनी दिले. लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. तीन वर्षात पुलाखालून बरच पाणी वाहून जाऊ शकतं. पण राऊतांच्या या खेळीमुळे चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा अॅक्टिव्हेट होतील आणि शिवसेनेच्या सक्रीय चेहऱ्यांमध्ये आगामी काळात बरेच बदलही दिसतील, ही शक्यता नाकारता येत नाही.

इतर बातम्या-

‘पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’, राऊतांच्या वक्तव्याला बोंडेंचं प्रत्युत्तर

नाना पटोले पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाची बैठक

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना.
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले...
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले....
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.