‘म्यूझियममध्ये पुतळे कसे असतात…मला घाम फुटला’; रणवीर-दीपिकाच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थसोबत नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नातील एक अनुभव शेअर केला आहे. त्याने यावर प्रतिक्रिया देताना तो तेव्हा फार अस्वस्थ झाला होता असही त्याने म्हटलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय होतं. असं काय घडलं होतं?

बॉलिवूड कपल रणवीर-दीपिका ही जोडी सर्वांचीच लाडकी आहे. या जोडीचे सगळेच फॅन आहेत. जेव्हा त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर जाहिर केलं. तेव्हा चाहत्यांना आनंद तर झालाच होता पण सर्वजण त्यांच्या लग्नाची नक्कीच वाट पाहत होते. जेव्हा त्यांची लग्नाची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांसाठी देखील ती एक गुड न्यूजच होती.
सिद्धार्थ जाधवही पत्नीसह होता रणवीर-दीपिकाच्या लग्नाला उपस्थित
त्यांच्या या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये अजून एक जोडी होती जी मराठी इंडस्ट्रीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. ही जोडी म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. मराठी मालिका, सिनेमे, नाटक करुन आज सिद्धार्थ जाधवने बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख मिळवली आहे.
सिद्धार्थ जाधव हा रणवीर सिंगचा जवळचा मित्र आहे हे सर्वांना माहित आहे. सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नाला गेल्यावर त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? याबद्दल त्याने खुलासा केला.
रणवीर-दीपिकाच्या लग्नात सिद्धार्थला आलेला अनुभव
सिद्धार्थने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी जेव्हा रणवीर सिंग सरांच्या आणि दीपिका मॅमच्या लग्नाला गेलो होतो. अमिताभ बच्चनपासून भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांपर्यंत सगळी माणसं तिथे होती. मी रणवीर सरांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दहाव्या मिनिटाला तृप्तीला सांगितलं, चल इथून जाऊया. लग्नाला जायच्या अगोदर खूप उत्सुक होतो. रणवीर सिंग सरांना भेटलो आणि आसपास सगळ्यांना बघत होतो. त्यावेळी मला दरदरुन घाम फुटला. मी दहाव्या मिनिटाला तृप्तीला जाऊया म्हणून सांगितलं. तृप्ती थांब म्हणत होती.” असं म्हणत त्याने त्यावेळी त्यांच्या लग्नाचा माहोल पाहून तो किती अस्वस्थ झाला होता याबद्दल सांगितलं.
“म्यूझियममध्ये पुतळे कसे असतात…”
सिद्धार्थ पुढे म्हणाला “म्यूझियममध्ये पुतळे कसे असतात आणि आपण त्यांना बघत असतो, तशी अवस्था माझी झाली होती. माझ्या आसपास जिवंत माणसं वावरत होती ज्यांना आपण बघत आलोय. कारण मी ज्या वसाहतीतून आलोय, जिथे मी पडद्यावर या लोकांना पाहिलंय, जिथे मी या लोकांना भेटेल वाटलं नव्हतं, कधी एकांकिका करताना पुढे नाटक सिनेमे करेल असं वाटलं नव्हतं. तो पोरगा आहे मी. त्यामुळे माणूस म्हणून हे क्षण जगण्याचा मी प्रयत्न करतो.” असं म्हणत त्याने त्याच्यासाठी हे सगळंच अनपेक्षित होतं असंही सिद्धार्थने सांगितलं.