कोणता मुख्यमंत्री भारी? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचा कौल कुणाला?
विशाळगडावर कुणाचे अतिक्रमण होता कामा नये. धर्मस्थळ तोडले त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. दोषींवर कारवाई व्हायला हवी मग शिवभक्त असो किंवा कुणीही असो असेही प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका येत्या काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर घोषणाचा अक्षरश: पाऊसच सुरु आहे. लाडकी बहीण योजनेनंतर उद्धव ठाकरे यांनी भावांनी काय करायचं असा सवाल केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लागलीच लाडका भाऊ योजना जाहीर करुन सर्वांना आश्चर्यचकीत करुन टाकले. आता लाडका भाऊ योजनेवर देखील टिका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कालच ही मागच्या दाराने कंत्राटी भरती असल्याचे म्हटले होते. तसेच दहावी पास असलेल्या तरुणांना सरकारने वाऱ्यावर टाकल्याची टीकाही केली होती. आता महायुतीतील आमदार बच्चू कडू यांनी देखील या योजनांवर टीका करीत सर्वकाही धडधाकट असलेल्या तरुणांना सरकार जादा पैसे देते आणि ज्यांना हातपाय नाही त्यांची एक हजार रुपयांवर बोळवण करते हे योग्य नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही येत्या 9 तारखेला ऑगस्ट क्रॉंती दिनी विभाग आयुक्त कार्यालयावर निराधार आणि दिव्यांगाना घेऊन मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
राज्य सरकारने केवळ जातीनिहाय आणि मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि भाऊ या योजना आणल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दिव्यांगाना ( अपंगांना ) सरकार केवळ एक हजार रुपये मानधन मिळते. त्यामुळे आपण विभागीय आयुक्त कार्यालयांवर येत्या 9 तारखेला क्रॉंती दिनी मोर्चा काढणार आहोत असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांनी कोल्हापूरच्या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या …गावातील हिंसाचारावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की विशालगडाच्या खालील वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मस्जिद उभारली आहे. प्रकार हा गडावरील अतिक्रमणापूरता होता, मात्र खाली कसा हा विषय आला माहीत नाही ? असेही ते म्हणाले.
मराठवाड्यात उमेदवार देणार
आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर बच्चू कडू लढणार नाही. आम्ही भाजपआणि शिवसेनेला जागा देऊ, मी दिव्यांग अभियानाचा एक भाग आहे. 80 हजार तक्रारी आल्या आहेत. मी मांडलेले मुद्दे संपले की विषय संपला. मग मी निवडणूक लढणार नाही. माझी युती मुद्द्यावर होणार ही ब्रेकिंग आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. मात्र आम्ही एकटे लढणार आहोत. शेतकऱ्यांनासोबत घेऊन लढणार आहोत. मराठवाड्यात यंदा विधानसभेचे उमेदवार देणार आहोत असेही ते म्हणाले.
आवडता मुख्यमंत्री कोण ?
पूजा खेडकर प्रकरणात आम्ही आणखी आम्ही 15 दिवस वाट पाहणार आहोत नंतर आम्ही धडा शिकविणार आहोत असे बच्चू कडू यांनी सांगितले. राज्यातील सर्वात चांगला मुख्यमंत्री कोण असे विचारले असता बच्चू कडू यांनी आतापर्यंतचा सर्वात बेस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की ठाकरे पक्ष प्रमुख म्हणून ठीक आहेत. मुख्यमंत्री म्हणून नाहीत असेही ते म्हणाले. सरकारने आता ‘लाडका दिव्यांग योजना’ आणावी ‘लाडका पत्रकार’ ही योजना देखील आणावी अशीही टीपण्णी त्यांनी केली.