Diwali 2024 : वाढत्या प्रदूषणामुळे पडू शकता आजारी, दिवाळीत अशी घ्या आरोग्याची काळजी !
थंडी जवळ येत आहे, त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हळूहळू हवेतील प्रदूषण वाढू लागेल आणि दिवाळीत तर त्यामध्ये आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान तब्येतीची,आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
हवेत थोडाफार गारवा येऊ लागताच प्रदूषणही वाढू लागले असून हवेची आयक्यू पातळी वाढली आहे. दिवाळीनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, सर्दी, डोकेदुखी, ॲलर्जी, डोळे लाल होणे, जळजळ होणे, पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे अशा समस्या उद्भवू लागतात. या काळात, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. दिवाळीच्या काळात आणि नंतर प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं असतं.
हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात वाढ ( Air Quality Index) म्हणजे प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खराब होणे. कारखाने, दररोज रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या, बाईक्स यामुळेही प्रदूषण वाढते. आणि दिवाळीत तर या सगळ्या सोबतच फटाकेही असतात, त्यामुळे प्रदूषण आणखीनच वाढतं. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.
मास्क वापरा
लहान मुलं असोत की तरूण किंवा वृद्ध नागरिक, सर्वांनीच घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जर मूल खूप लहान असेल तर त्याला जास्त घराबाहेर न नेण्याचा प्रयत्न करा, तसेच घरात डास मारणारी कॉईल लावणं टाळावे. रुम फ्रेशर स्प्रे वगैरेही कमी वापरावे.
शरीर हायड्रेट ठेवा
प्रदूषण टाळण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. तरुण लोकांनी दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी प्यावे, तर लहान मुले आणि वृद्धांनी 5-6 ग्लास पाणी प्यावे. पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं. याशिवाय पोषण मूल्य असलेली हेल्दी पेय प्यावीत. जर बाळ नवजात किंवा सहा महिन्यांपेक्षा लहान असेल आणि त्याला पाणी देता येत नसेल तर त्याला दर दोन तासांनी आईचे दूध देण्याचा प्रयत्न करा.
डोळे कसे ठेवाल निरोगी ?
प्रदूषित हवेमध्ये आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी विशेष कालजजी घ्यावी. बाहेर जाताना चांगल्या दर्जाचा चष्मा किंवा गॉगल वापरा. विशेषतः बाईक चालवणाऱ्यांनी याची अधिक काळजी घ्यावी. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून देखील डोळ्यांचे संरक्षण होतं. याशिवाय जर तुमच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा लालसरपणा जाणवत असेल तर वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय दर तीन ते चार तासांनी डोळ्यांवर थंड पाणी शिंपडत राहावे आणि हाताने डोळे चोळणे टाळावे.
आहाराची काळजी घ्या
प्रदूषणामुळे आजारी पडू नये म्हणून, मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे.त्यासाठीच आपल्या आहारात व्हिटॅमिन सी (पालक आणि इतर हिरव्या भाज्या, संत्री, किवी, द्राक्षे, लिंबू, आवळा) समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. त्याशिवाय दूध, तुळशीचा काढा, मध यांसारख्या पदार्थांचे सेवन करा, त्यानेही रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते. रोजच्या आहारात अंडी, दूध, लसूण, सर्व भाज्या, फळं, इत्यादि पदार्थांचे नियमित सेवन करावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)