Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांना महत्त्वाचा आदेश

| Updated on: Mar 18, 2025 | 7:56 AM

Nagpur Violence : नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा सर्व राडा झाला. वाहनांची तोडफोड, वाहनं पेटवून देणं, दगडफेक अशा घटना घडल्या. नागपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे.

Nagpur Violence :  नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांना महत्त्वाचा आदेश
Devendra Fadnavis
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण लागलं. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. कालच्या घटनेनंतर नागपुरात आता तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. “नागपूरच्या महाल भागात जी काही घटना घडलेली आहे, ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमाव जमा होऊन दग़डफेक होणं अत्यंत चुकीच आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की, सर्वांना कायदा-सुव्यवस्थेच पालन करावं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे” असं त्यांनी सांगितलं. “मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलय, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी शांतता ठेवावी” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नागपूर शहरात कलम 144

नागपूर शहरात कलम 144 लागू केल्याची पोलिसांनी माहिती दिली. नागपूरचे भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी बाहेरून आलेल्यांनीच घरेदारे पेटवल्याचा आरोप केला आहे. नागपूरच्या महाल भागात काल समाजकंटक बेभान झाले होते. रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवली. त्यानंतर काही लोकांनी जेसीबी वाहन पेटवून दिलं. त्यामुळे आगीचा एकच भडका उडाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.