कल्याणची इराणी वस्ती होणार जमीनदोस्त, पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट लवकरच
कल्याण आंबिवलीतील इराणी वस्तीवर लवकरच मोठी कारवाई होणार. पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन तर इराणी वस्तीवर पालिकाही चालवणार बुलडोझर. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली माहिती

ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील कुप्रसिद्ध इराणी वस्ती ही पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कायम चर्चेत असते. सराईत गुन्हेगारांचा अड्डा म्हणून या वस्तीची ओळख आहे. पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून त्याच हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लवकरच कोंम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे नियोजन सुरू केले आहे. एटीएसचीही मदत घेत सराईत गुन्हेगारांना अटक करण्याचा निर्णय तर गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई देखील होणार आहे.
गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवरही कठोर कारवाई
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सदस्य अनिल परब यांच्या चर्चेदरम्यान राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या इराणी वस्तीमध्ये अनेक सराईत गुन्हेगार लपतात. पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता. तेथील महिला त्यांच्यावर हल्ले करतात. त्यामुळे येथे कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
या वस्तीमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हेगार पडीक आणि वापरात नसलेल्या इमारतींमध्ये लपतात, त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू आहे.
मकोका अंतर्गत कारवाई आणि एटीएसची मदत
गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
काय असेल पुढील पाऊल ?
या कारवाईमुळे आंबिवली परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी ऑपरेशनची तयारी पूर्ण केली असून, लवकरच मोठी कारवाई सुरू होणार आहे.