Aurangabad: विकृत लोक पाणीपुरवठा योजनेविषयी अफवा पसरवत आहेत, पालकमंत्री सुभाष देसाई यांचा टोला, इम्तियाज जलील यांचेही प्रत्युत्तर
औरंगबााद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नव्या योजनेवरून आज राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिवसेना नेते व पालकमंत्री सुभाष देसाई, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजप आमदार अतुल सावे यांनी परस्परांवर आरोप केले.
![Aurangabad: विकृत लोक पाणीपुरवठा योजनेविषयी अफवा पसरवत आहेत, पालकमंत्री सुभाष देसाई यांचा टोला, इम्तियाज जलील यांचेही प्रत्युत्तर Aurangabad: विकृत लोक पाणीपुरवठा योजनेविषयी अफवा पसरवत आहेत, पालकमंत्री सुभाष देसाई यांचा टोला, इम्तियाज जलील यांचेही प्रत्युत्तर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/10183245/Desai-compressed-1.jpg?w=1280)
औरंगाबादः महापालिका निवडणुका जवळ येत आहेत, तसं शहरातील विविध राजकीय मुद्देही डोके वर काढत आहेत. शहरातील नेत्यांनी आता नव्या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उचलून धरला आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या या योजनेला दिरंगाई होत असल्याचा आरोप शिवसेनेवर केला जात आहे. मात्र शुक्रवारी शिवसेना नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी योजनेचे काम आणि त्यावर चाललेल्या राजकीय कुरघोडीवरून भाष्य केले. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि भाजपचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांनीही खरमरीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
काय म्हणाले सुभाष देसाई?
पालकमंत्री सुभाष देसाई गेल्या काही दिवसांपासून शहरात आहेत. शहरातील विविध राजकीय कार्यक्रमांना त्यांची सक्रीय उपस्थिती आहे. सुभाष देसाई म्हणाले, ‘ शहरातील पाणीपुरवठा योजनेबद्दल विकृत प्रवृत्ती अफवा पसरवत आहेत. ही योजना अजिबात रखडलेली नाही. 1680 कोटी रुपयांची रक्कम महिना दोन महिन्यात खर्च होणार नाही, तीन वर्षांत ही योजना पूर्ण होणार आहे. चुकीच्या प्रवृत्तींचे मी निषेध करतो, असं सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं.
लोकांना उल्लू बनवण्याचा प्रकार- खा. जलील
तर पालकमंत्री योजनेच्या कामाबाबत खोटं बोलत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. ही योजना या गतीने सुरू राहिल्यास योजना पूर्ण होण्यास पाच ते सात वर्षे लागतील. निवडणुकांसाठी शिवसेनेकडून योजनेचे काम वेगात सुरू असल्याच्या केवळ घोषणा दिल्या जात आहेत. लोकांना कामाविषयी काही घेणं देणं नाही, त्यांना पाणी हवं आहे. पण शिवसेनेचा हा प्रकार लोकांना उल्लू बनवण्याचा आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
काँट्रॅक्टरला पाठिशी घालण्याचे प्रकार- आ. अतुल सावे
या योजनेविषयीच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये भाजपनेही उडी घेतली आहे. भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी न आणता शहरात टाक्यांचे काम आणि पाईपलाईनचे काम सुरू आहे. हा सगळा प्रकार निवडणुकीच्या तोंडावर लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रकार आहे. औरंगाबाद ऑलरेडी पाण्याच्या टाक्या आहेत, पाईपलाईन उपलब्ध आहे फक्त पाणी हवं आहे पण पाणी आणलं जात नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर ला फेवर करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे असा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला आहे.
इतर बातम्या-