वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात मोठं ट्विस्ट; महादेव गित्तेचा मोठा गौप्यस्फोट
तुरुंगामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र आता या प्रकरणात महादेव गित्तेच्या वक्तव्यानं मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत. त्यांना तिथे मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात होतं. मात्र बीड जिल्हा कारागृहाकडून कराड -घुलेला झालेल्या मारहाणीचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, असं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
मात्र या घटनेनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्तेची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना माहदेव गित्तेनं मोठं वक्तव्य केलं आहे.
गित्तेचा दावा काय?
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात होतं. मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर लगेचच आता बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्तेची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आहे. मारहाण करून आम्हालाच छत्रपती संभाजीनगरला पाठवलं जात आहे. या प्रकरणात अक्षय भैय्याचा काहीही संबंध नाही, असं गित्ते याने म्हटलं आहे.
तुरुंग प्रशासनानं मारहाणीचं वृत्त फेटाळलं
दरम्यान या सर्व प्रकरणात तुरुंग प्रशासनाकडून प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या बातम्या सुरू आहेत, मात्र असा कोणताही प्रकार घडला नासल्याचं तरुंग प्रशासनाने म्हटलं आहे.