झटका मटण, राज्यातील धार्मिक तेढ आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, गुन्ह्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रान पेटलेलं असतानाच अखेर 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला , पण या सगळ्याला उशीरा झाला का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना विचारण्यात आला

बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, गुन्ह्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रान पेटलेलं असतानाच अखेर 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला , पण या सगळ्याला उशीरा झाला का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी त्यावर स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. बीडची आज जी अवस्था आहे आधी ती कधीच नव्हती असे सांगत त्यांनी एकंदर प्रकरणावर भाष्य केलं. तसेच राज्यातील धार्मिक तेढ आणि मल्हार झटका मटणावरून सुरू असलेल्या वादंगाबद्दलही ते थेट बोलले.
जो कोणी कायदा हातात घेईल त्यांना…
बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो. पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. शांत, समन्वयाने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा बीड जिल्ह्याचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वत: जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे सहा-सहा सदस्य निवडून आले होते, तिथे एक प्रकारे सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला गेले काही महिने बीडमध्ये दिसत आहेत. माझं स्पष्ट मत आहे की राज्य सरकारने यात कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त धोरण आखण्याची गरज आहे. आणि बीडला पूर्वीचे वैबवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी असे शरद पवार म्हणाले.
हे सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सख्त कारवाई करावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केलं.
उसाचं दर एकरी उत्पादन पाहता उसामध्ये साखर याचं प्रमाण वाढेल. उसाचा धंदा अधिक सोयीचा आणि परवडणारा होईल. हे चमत्कार होऊ शकतात. एआयमुळे होऊ शकतात. हे तंत्र आणण्याचा बऱ्याच दिवसापासून सुरू होता. मला आनंद आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्याने यात सहभागी होण्याची तयार दाखवली. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठक होणार आहे. 300 प्रतिनिधी येतील. त्यांच्यासमोर हे तंत्र दाखवलं जाईल. हा क्रांतीकारक निर्णय महाराष्ट्रातून सुरू होईल,असेही त्यांनी सांगितलं.
मल्हार झटका मटणाचा मुद्दा, पवारांनी थेट सुनावलं
मल्हार झटका मटणाच्या मुद्यावरूनही शरद पवार यांनी थेट सुनावलं. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंची मटण चिकनची दुकाने उघडली जातील. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम च्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. मटण विकणारा हिंदूच असेल आणि मटणात भेसळ नसेल असा दावा आहे. तसेच हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावी असं आव्हान नितेश राणे यांनी केला होता. त्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. याबद्दल शरद पवार यांना सवाल विचारण्यात आला असता ‘राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही. हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का ?’ असं म्हणत त्यांनी मुद्दा महत्वाचा नसल्याचे सांगत झटकून टाकला.