भाजपने फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग; ‘हा’ केंद्रीय नेता करणार शनिवारपासून महाराष्ट्र दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने या नेत्यांनी राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपही मागे नसल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुका अवघ्या दीड ते दोन महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक नेत्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. काही नेते थेट जनतेशी संवाद साधत आहेत. तर काही नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यासोबत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. आता भाजपनेही निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा महाराष्ट्रव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या तयारीचा कानमंत्र देणार आहेत.
आज भाजपच्या नेत्यांची बैठक होती. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने आता पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भूपेंद्र यादव यांनी राज्यव्यापी दौरा करावा, असं आजच्या बैठकीत ठरलं. त्यानुसार भूपेंद्र यादव येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि जिल्ह्यांचा आढावा
भूपेंद्र यादव आपल्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन पक्षाची जिल्हानिहाय स्थिती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे यादव यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप ढवळून निघणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
जागा वाटप करून टाका
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा अधिक जागा लढवाव्यात असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली आहे. या लोकसभेती मते आणि विधानसभेतील मते याची तुलना करून अधिकाधिक मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचा आग्रह हे नेते धरत असल्याचं दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्व्हे करण्याचंही भाजपमध्ये घटत असल्याचं सांगितलं जात आहे.
जागांचा फेरबदल होणार
दरम्यान, महायुतीत जागा वाटपावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे आपण कोणत्या जागा लढवणार? अजितदादा गट आणि शिंदे गट कोणत्या जागा लढवणार आणि इतर छोट्या पक्षांना कोणत्या जागा देणार याचा निर्णय लवकर करण्यावरही भाजपच्या नेत्यांचा कल असल्यचं सांगितलं जात आहे. तसेच काही जागांवर फेरबदल करण्यास पक्षाच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहितीही मिळत आहे.