Blood Bank : रक्ताच्या तुटवड्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार! प्रत्येक तालुक्यात सुरु होणार रक्तपेढी

राज्याच्या अनेक तालुक्यांत रक्तपेढी नाहीत. अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करीत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Blood Bank : रक्ताच्या तुटवड्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार! प्रत्येक तालुक्यात सुरु होणार रक्तपेढी
रक्तदान
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 11:28 AM

मुंबई: रक्ताला अद्यापही विज्ञानाने (Science) पर्याय दिलेला नाही. त्यामुळे रक्तदान (Blood Donation) केले पाहिजे. कोविडच्या (Covid) कालावधीतही आपल्या राज्याने देशातील सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केले आहे. ही बाब अतिशय महत्वाची आहे. राज्याच्या अनेक तालुक्यांत रक्तपेढी नाहीत. अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करीत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

रक्तदानाबाबत असलेले अनेक गैरसमज दूर होण्याची गरज

महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल, असेही राजेश टोपे म्हणाले. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रक्तदानातून साध्य होत आहे. आई वडीलांच्या खालेखाल रक्तदानातून जोडले गेलेले नाते सर्वात पवित्र आहे. रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., श्री साईबाबा शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते. यावेळी सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ अरुण थोरात, डॉ. अर्चना जोगेवार, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.