“एकनाथ शिंदे फडणवीसांप्रमाणेच धनगरांना फसवण्याचे काम करतात”, काँग्रेसचा घणाघात, म्हणाले “आदिवासी विरुद्ध धनगर वाद…”
शेतकऱ्यांना गोरगरिबांना नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत. त्यासाठी जबाबदार राजकारणींना सदबुद्धी देवो आणि महाराष्ट्राचा विकास होवो अशी मनोकामना केली", असेही नाना पटोले म्हणाले.
Nana Patole On Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यताच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत. गेल्या 9 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु झाले आहे. आता यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
भाजपने 2014 मध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (आदिवासी) आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आता १० वर्ष उलटल्यानंतरही अद्याप याबद्दल कोणतीही पाऊलं उचलली गेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने उपोषणाची हाक दिली आहे. याबद्दल नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. धनगरांना फसवण्याचे काम जसं देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तसंच काम आता एकनाथ शिंदे देखील करत आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
“एकनाथ शिंदे धनगरांना फसवतात”
“राज्य सरकारचे नेते आदिवासी आणि धनगर असा वाद पेटवण्याचे काम करत आहेत. एसटीमधून आरक्षण देणार म्हणतात, पण आदिवासींचा रोष हे सरकार पत्करणार का? हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समाजाला यांनी आरक्षणाच्या लॉलीपॉप दिला आहे. आश्वासन दिले की हे सरकार काम करत आहे. पण आता निवडणुकीनंतर यांना याची किंमत चुकवावी लागणार आहे. धनगरांना फसवण्याचे काम जसं देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच काम आता एकनाथ शिंदे देखील करत आहे”, असे नाना पटोले म्हणाले.
“सरकार रंगांमध्ये खेळण्यातच मग्न”
“आमचा धनगरांना एसटीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध असणार आहे. रंगात खेळण्यापेक्षा या राज्यामध्ये काय सुरू आहे हे राजकारण्यांनी पाहावं. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पाहावं, हे सरकार रंगांमध्ये खेळण्यातच मग्न झालेला आहे”, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
“गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर नाना पटोले यांनी बाप्पााला साकडं घातलं. राज्यामध्ये बळीराजावर जे संकट आलेलं आहे. शेतकऱ्यांना गोरगरिबांना नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत. त्यासाठी जबाबदार राजकारणींना सदबुद्धी देवो आणि महाराष्ट्राचा विकास होवो अशी मनोकामना केली”, असेही नाना पटोले म्हणाले.