Devendra Fadanvis : माझा सगासोयरा असेल तर त्यालाही सोडणार नाही; विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचं कडक प्रत्युत्तर
आम्ही तिघं एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केलात किंवा बांबूची लागवड केली तरीही.. काय म्हणाले मुख्यमंत्री ?

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं.
अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा आहे, इतके वर्ष आपण सभागृहात आहोत. इतका मोठा टेक्स्ट कधीच नव्हता. त्यातील अर्ध्या विषयावर कोणीच बोललं नाही. टेक्स्ट तयार करणारे आणि मांडणारे यांच्यात काही बोलणं झालं का? मी गृहविभागाच्या सर्व विषयांवर उत्तर दिलं होतं. तरीही प्रश्न आले. काही अडचण नाही. पण नव्याने काहीच मांडणी नाही. तिच मांडणी झाली.
सुनील प्रभूंनी जी आकडेवारी मांडली, तीच आकडेवारी नाना पटोलेंनी मांडली. मूळातच मला असं वाटतं की, विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव संधी असते, ज्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही, त्यातील महत्त्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात आणता येऊ शकतात. पण दुर्देवाने तसं होऊ शकलं नाही. मी व्हॉलिंटियर करायला तयार आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत घेईन असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
भुजबळ साहेब एकटेच होते पण…
शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं लोकशाहीत महत्त्वाचं आहे. सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटेच होते. संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे. पण विषय योग्यच घ्यायचे. म्हणून मला वाटतं भास्करराव, तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचा दिसतो.
माझा सगेसोयरा असेल तरी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही
गृहमंत्री असलो की प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. 2022 ते 24 तुम्ही मला टार्गेट केलं. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मँडेट आम्हाला दिलं. कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी दिला. माझा सगा भारताचं संविधान आणि माझे सोयरे हे 13 कोटी महाराष्ट्राची जनता आहे. याच्यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही, असे फडणवीसांनी बजावून सांगितलं.
अलिकडे एक वाक्य वापरलं जातंय… कुंपनच शेत खातंय… कुंपनच शेत खातंय… आहे कुठलं कुंपन नाना भाऊ? आमच्या शेताला कुंपनच नाही. हे खुलं शेत आहे. कोणीही येऊ शकतं आमच्या शेतात. मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्यासाठी. त्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे.
त्या कोरटकरला पकडलं . कुठं पकडलं? कुठे लपून बसला होता. तेलंगनात कुणाच्या घरी. कोण त्याला आश्रय देत होता. आपल्याला राजकारण करायचं नाही. शिवाजी महाराजांवर कोणी बोलत असेल तर कारवाई करूच. कारण ते आपलं दैवत आहे. दैवताचा अपमान निश्चितपणे सहन करणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
जितेंद्र आव्हाड साहेब काल ते कायद्याचं राज्य. लोकशाही कोसळली, वगैरे म्हणत होते. मला कळत नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते की बांगलादेशबाबत. आज ते सभागृहात नाही. पण ते कुठे असतील तर माझं भाषण ऐकतीलच. पण मी त्यांना विचारू इच्छितो की, काही नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनयना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना राणावत, नारायण राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी आणि यातील नावं आठवत नसतील तर एक नाव नक्की आठवेल अनंत करमुसे. त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होती. राष्ट्रावर कोणतंही संकट नव्हतं. संविधानाप्रमाणे काम चाललं होतं. म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. त्यामुळे मला वाटतं की आव्हाड साहेब असते तर बरं झालं असतं, असा टोला फडणवीसांनी लगावला
कितीही काड्या घाला तरीही..
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. अजित दादा एकदम दरडावून बोलतात,त्यामुळे त्यांच्या वाटेला फारसं कोणी जात नाही . आम्ही दोघं आपले ( फडणवीस आणि शिंदे) मवाळ, सगळ्यांना घेऊन आम्ही चालत असतो, त्यामुळे तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केलात किंवा बांबूची लागवड केली तरीही.. यश मिळणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का?
आव्हाडांचं भाषण ऐकलं, अनेकांचं ऐकलं. दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? इतकी छाती काय बडवायची ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. अक्षय शिंदेचं एन्काऊंटर नसतं झालं तर बरं झालं असतं. कायद्याने फाशी झाली असती. पण असं छाती बडवणं चाललं आहे. जसं काय तो अक्षय शिंदे स्वातंत्र्य सेनानीच होता. रोज तेच. एवढं दु:खं. दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारींना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांच्याबद्दल कुणाच्या मनात संवेदना तयार झाली असेल तर ते योग्य नाही. त्या संदर्भात काही लोकांची मने ही तपासूनच पाहावी लागतील, असं फडणवीस म्हणाले.